जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने हळदी-कुंकू समारंभामध्ये चारशे ग्रंथांचे वाटप

प्रतिनिधी/अकलूज (माय मराठी न्यूज)


जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने हळदीकुंकू आणि तिळगूळ स्नेह मेळाव्याचे आयोजन प्रा. मिनाक्षी अमोल जगदाळे पुणे विभागीय अध्यक्ष (सातारा, सोलापूर) यांच्या घरच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी चारशे महापुरुष आणि महानायिकांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. विशेष बाब म्हणजे त्या गेल्या सहा वर्षापासून विधवा महिलांनाही हळदी कुंकवाचा मान देतात. प्रा. जगदाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी बोलताना प्रा. जगदाळे म्हणाल्या की, विधवा असणे हा कांहीं स्त्रियांचा अपराध नाही, समाजात विधवांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, कारण विधवांनी देखील इतिहास घडविला आहे. जिजामाता, ताराबाई, अहिल्यामाता, सावित्रीबाई, उमाबाई दाभाडे यांनी पती निधनानंतर सती न जाता हिंमतीने इतिहास घडविला. विधवा अशुभ नसतात, त्यांचाही आदर, सन्मान झाला पाहिजे, त्यांना मंगल कार्यात सहभागी केले पाहिजे. या उदात्त हेतूने मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड पुणे विभागाच्या वतीने अकलूज येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या प्रसंगी त्यांनी जिजाऊ ब्रिगेडची प्रागतिक विचारधारा समजावून सांगितली.
प्रथमतः सौ. सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, शितलादेवी मोहिते पाटील, शिवन्यादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात चारशे महत्वपूर्ण ग्रंथांचे वाटप करण्यात आले. मान्यवरांनी महिला सक्षमीकरणावर आपले विचार मांडले. “स्त्री ही अबला नसून ती सबला आहे, ती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम आहे, असे सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. तर सौ शीतलदेवी मोहिते पाटील म्हणाल्या की, महिलेला संधी दिली तर ती देश चालवू शकते, न्यायदान करू शकते, विमान चालवू शकते, विद्यापीठ चालवू शकते, अवकाशात भरारी मारू शकते. मुलाप्रमाणे मुलीलाही वंशाचा दिवा मानले पाहिजे. मुलगा मुलगी भेदभाव नको असे विचार सौ. देवण्या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी मांडले. सौ जगदाळे म्हणाल्या की, महिला वैचारिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी व सर्व महापुरुष व महानायिकांचे कार्य व प्रेरणादायी विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. गेल्या सहा वर्षापासून मी ग्रंथरूपी वैचारिक वाण महिलांना वाटत आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. स्नेहल घाडगे यांनी केले, तर आभार करुणा धुमाळ यांनी मानले. या कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी हेमलता मुळीक, आशा सावंत, सुवर्णा क्षीरसागर, चव्हाण, गायकवाड, संगीता जगदाळे, भावना देशमुख उपस्थित होत्या. यावेळी सौ. पाटील, सुवर्णा शेंडगे, खटके, गोवे, डॉ. अर्चना गवळी, संध्या सावंत, अर्चना सूर्यवंशी, डॉ अंजली कदम, डॉ. खडतरे, डॉ. श्रद्धा जवंजाळ, डॉ. देवडीकर, डॉ. गांधी, डॉ. बुरुंगुले, डॉ. एकतपुरे, डॉ. प्रीती गांधी, प्राध्यापक वृंद तसेच राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रचंड संख्येने महिला उपस्थित होत्या.




