
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


कमला भवानी शुगर लि. पांडे ता. करमाळा या साखर कारखान्याच्या वतीने पोथरे व बोरगाव येथे ऊस पीक परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आष्टा जि. सांगली येथील कृषिभूषण शेतीनिष्ठ महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त, कृषिरत्न मा. डॉ. संजय दादा माने यांनी उसाचे एकरी १०० मे. टना पेक्षा जास्त उत्पादन कसे घ्यावे तसेच खोडवा ऊस पिकाचे उत्पादन वाढवणे याकरिता काय करावे या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री. कमलाभवानी व कै. विठ्ठलराव (भाऊ) शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच उपस्थित मान्यवर व मार्गदर्शक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. ८ ऑक्टोबर रोजी पोथरे येथे सकाळी ८:०० वा. तर बोरगाव येथे सकाळी १०:०० वा. करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शनपर बोलताना डॉ. संजीव माने म्हणाले की, उसासारख्या शाश्वत उत्पन्न देणाऱ्यांना नगदी पिकाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केल्यास एकरी १५० टनापर्यंत ऊस उत्पादन घेणे शक्य आहे. ऊस हे जमिनीतील अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात शोषून घेणारे पिक असून त्याला मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्याची आवश्यकता असते. त्यामुळे ऊसाला रासायनिक खता ऐवजी जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा म्हणजे शेण खताचा वापर केला तर उसाच्या उत्पादनात वाढ होते असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पोथरे येथील कार्यक्रमात माजी सभापती किसन शिंदे, हरिभाऊ झिंजाडे, माजी सरपंच विष्णू रंधवे, जयद्रथ शिंदे, प्रभाकर शिंदे, आबासाहेब शिंदे, दत्तात्रय आढाव, युवा नेते शहाजी झिंजाडे, उपसरपंच योगेश रणवरे तसेच बोरगाव येथील कार्यक्रमात सरपंच दीपक भोज, माजी सरपंच विनय ननवरे, किसन भोज, वाघाचीवाडीचे सरपंच देविदास वाघ, प्रगतशील बागायतदार संभाजी डवले, भीमराव गायकवाड, साहेबराव घाडगे, सुधीर भोगल, संतोष शिंदे, काका भोगल आदि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे जनरल मॅनेजर (केन) श्री. भारत रोकडे साहेब यांनी केले. तर आभार बोरगावचे माजी सरपंच विनय ननवरे यांनी मानले. यावेळी कमलाभवानी साखर कारखान्याच्या शेती विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी व बोरगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या पंचसुत्रीचा वापर केल्यास ऊसाची नक्कीच उत्पादन क्षमता वाढते
ऊस शेतीमध्ये जमिनीची सुपीकता, ऊस लागवडीची योग्य पद्धत, रासायनिक खताची मात्रा, पाण्याचे योग्य व्यवस्थापन व पीक संरक्षण या पंचसूत्रीचा अवलंब केला तर उसाच्या एकरी उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.



