नाशिक जवळ रेल्वे दुर्घटना; ‘पवन’ एक्सप्रेस चे अकरा डबे रुळावरून घसरले
माय मराठी न्यूज नेटवर्क


नाशिकजवळ जयनगर एक्सप्रेसचे अकरा डबे रूळावरून घसरले आहेत. आज रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण मृत आणि जखमींबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पवन एक्सप्रेस रुळावरून घसरली आहे. अपघात कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट नाही. पण एकाचा मृत्यू तर काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मध्य रेल्वेचे मुंबईतील जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी या अपघाताची माहिती दिली आहे. दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी एलटीटी जयनगर एक्सप्रेस चे काही डबे लहवित ते देवळाली रेल्वे स्थानकादरम्यान घसरले आहेत. या घटनेनंतर मदतीसाठी ट्रेन रवाना करण्यात आली आहे, अशी माहिती शिवाजी सुतार यांनी ट्विट करून दिली आहे. रेल्वेने या घटनेनंतर हेल्पलाइन क्रमांकही जारी केली केले आहेत.
या दुर्घटनेमुळे मुंबईहून भुसावळच्या दिशेनं होणाऱ्या रेल्वेवर परिणाम झाला आहे. सध्या मदत व बचाव कार्य सुरू आहे. रेल्वे विभागाने केलेल्या विनंतीवरून अडकलेल्या प्रवाशांना आणण्यासाठी एसटी महामंडळ आणि महानगरपालिका ट्रान्सपोर्टच्या बसेस पाठविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ॲम्बुलन्स आणि फायर ब्रिगेड च्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
अपघातामुळे या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
या अपघातामुळे गाडी क्र. १२१०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मनमाड, गाडी क्र. १२११० मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गाडी क्र. ११४०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आदिलाबाद या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर गाडी क्र. २२२२१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भुसावळ गाडी मार्गे वसई रोड जळगाव, गाडी क्र. १२२६१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भुसावळ मार्गे वसई रोड जळगाव आणि गाडी क्र. १२१७३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मनमाड या गाड्या दुसऱ्या मार्गांवरून वळवण्यात आल्या आहेत.




