
प्रतिनिधी/ ऋषिकेश चव्हाण


युवा सेनेतर्फे आज राज्यभर कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक थाळी वाजवून मोदी सरकारचा निषेध केला. स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. इतर वस्तूंची महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे. त्याचा निषेध म्हणून युवा सेनेतर्फे राज्यात थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले.
करमाळयात देखील युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे शहरप्रमुख विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली थाळी वाजवून केंद्र सरकार चे उपहासात्मक आंदोलन करुन अभिनंदन करण्यात आले. या वेळी बोलताना समन्वयक शंभुराजे फरतडे म्हणाले की मोदी सरकारने दिलेल्या कोणत्याही आश्वासनांची पूर्तता केली नाही. ही जी फसवणूक जनतेची झाली ती एक प्रकारे एप्रिल फूल आहे.महागाई वाढवुन सामान्य कुटुंबाची चुल बंद पाडण्याचे पाप मोदी सरकार ने केले आहे असे देखील फरतडे यांनी म्हटले असून आम्ही देखील उपहास म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव केला आहे. या सरकारने जनतेची दिशाभूल केलेली आहे. त्यांच्या कृपेने प्रचंड महागाईचे अच्छे दिन आले आहेत. त्यासाठी त्यांचे अभिनंदन केले आहे असे फरतडे यांनी सांगीतले.
महिला आघाडीच्या प्रियंका गायकवाड म्हणाल्या की या सरकारने स्वयंपाकाच्या गॅसची योजना आनली. त्यात स्वयंपाकासाठी चुल बंद करू असे सांगण्यात आले. रॅाकेलमुक्त करू असे सांगितले. आज खरोखर लोकांना चुल बंद करून उपवास करण्याची वेळ आली आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दर एव्हढे वाढले आहेत की या महागाईने गृहिणी रडकुंडीला आले आहेत. त्यांचे दर एक हजाराच्या पुढे गेले आहेत. केंद्र सरकारचा अजेंडा होता महागाई दुर करू. आता खरोखर त्यांनी महागाईचा कळस गाठला आहे. त्यामुळे आगामी काळात या सरकारला त्यांची जागा दाखवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केंद्र सरकारचे वाभाडे काढताना महागाई चा भस्मासुर वाढवणाऱ्या या केंद्र सरकारला जागा दाखवण्याची वेळ आली आहे असे सांगीतले.
यावेळी माजी शिवसेना शहरप्रमुख संजय शिलवंत, उपतालुकाप्रमुख बंडु शिंदे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, प्रसाद निंबाळकर काळे, नागेश लोकरे आदी उपस्थित होते.



