
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) संदर्भात विद्यार्थ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर CET साठी पुन्हा नोंदणीची संधी द्यावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ सेल्फ फायनान्स इन्स्टिट्यूट्स (ASFI) यांनी राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना CET परीक्षा वर्षातून दोन वेळा देता येणार आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी प्रत्यक्षात अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. कारण बारावीचा निकाल लागण्यापूर्वीच CET साठी नोंदणी करावी लागते. त्यामुळे विद्यार्थी अंदाजावर निर्णय घेतात. मात्र निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांचे मत बदलते. काहींना इंजिनिअरिंग (PCM) ऐवजी फार्मसी (PCB) किंवा इतर अभ्यासक्रम निवडायचे असतात. मात्र एकदाच नोंदणी केल्यामुळे त्यांना दुसऱ्या कोर्ससाठी अर्ज करता येत नाही.
याच पार्श्वभूमीवर २ मे २०२६ रोजी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर किमान एक आठवड्याची विशेष मुदत देऊन CET साठी पुनःनोंदणीची संधी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना योग्य आणि माहितीपूर्ण निर्णय घेता येईल, ताण कमी होईल आणि कोणताही पात्र विद्यार्थी संधीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी योग्य निर्णय घेण्याची संधी अत्यंत महत्त्वाची आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे सीईटी परीक्षा नोंदणीसाठी पुन्हा एकदा विशेष कालावधी देणे ही विद्यार्थ्यांच्या हिताची आणि न्याय मागणी आहे.
प्रा. रामदास झोळ, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ सेल्स फायनान्स इन्स्टिट्यूटस महाराष्ट्र राज्य.




