केम येथील ‘या’ विद्यालयात डॉ. बापूजी साळुंखे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ. बापुजी साळुंखे साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्य सौ. शुभांगीताई गावडे यांच्या शुभहस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, यशकल्याणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. गणेश करे पाटील, करमाळा B.D.O. श्री. मनोज राऊत, जि.प सदस्य श्री दिलीपदादा तळेकर, प्राचार्य विष्णू कदम व मराठवाडा विभागातील सर्व शाखा प्रमुख उपस्थित होते.

या संमेलनाची सुरुवात श्री उत्तरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री. दादासाहेब गोडसे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करून ग्रंथदिंडीने झाली. या दिंडीमध्ये ह.भ.प. श्री स्वप्निल महाराज शिंदे, श्री उत्तरेश्वर कोरे, भजनी मंडळ पाथुर्डी, सर्व विद्यार्थी, गुरुदेव कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर मुख्य उद्घाटन सोहळ्यामध्ये प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत राबवणाऱ्या या साहित्य संमेलन उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी मराठी साहित्याचा आढावा घेत श्री उत्तरेश्वर संस्कृती केंद्राचा इतिहास सांगत परमपूज्य बापूजींचे ऐतिहासिक शैक्षणिक कार्य सांगितले.
यावेळी श्री. कौस्तुभ गावडे यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांचे महत्त्व सांगत गुरु शिष्य नातेसंबंध यांचे महत्त्व सांगितले. प्राचार्य डॉ. जयसिंगराव यांनी साहित्य संमेलनाचा इतिहास सांगून उत्तरेश्वर संस्कृती केंद्रातील विविध उपक्रमाचे कौतुक करीत हे साहित्य संमेलन राज्य स्तरावर घेण्याचे सुचविले. या कार्यक्रमात गटविकास अधिकारी मनोज राऊत म्हणाले की, करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा नावलौकिक असून साहित्य संमेलन ग्रामीण भागात होत आहे. याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तसेच यावेळी शिक्षण प्रेमी गणेश हरी पाटील यांनी बोलताना आजचे मराठी लेखक आणि ग्रामीण भाग यांची सांगड कशी आहे याचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षक प्राध्यापक डॉ. मच्छिंद्र नांगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रचार्या सौ. शुभांगी ताई गावडे याना केम ग्रामस्थांच्या वतीने मानपत्र देण्यात आले. या साहित्य संमेलनात परिसंवाद, कथाकथन, नटसम्राट, नाटक, एकांकिका, मिमीक्री शो असे बहारदार कवी संमेलन पार पडले. या कार्यक्रमास समेलनाचे पहिले अध्यक्ष प्रा.डॉ. शिवाजीराव देशमुख, केंद्र प्रमुख महेश कांबळे, ज्येष्ठ नेते दिलीपदादा तळेकर, शालेय समिती अध्यक्ष दयानंद तळेकर, उपाध्यक्ष ऊज्वला तळेकर, चेअरमन दादासाहेब गोडसे, पत्रकार संजय जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मुख्यध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व केम परिसरातील पालक वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मच्छिंद्र नांगरे यांनी केले तर सूत्रसंचालन कुंडलिक वाघमारे सर यांनी केले. आभार प्रचार्य विष्णू कदम यांनी मानले. केम येथे प्रथमच असे साहित्य संमेलन झाले याचे केम व परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.




