
प्रतिनिधी/मच्छिंद्र वाघमारे


कोर्टी ते आवाटी हा रस्ता दळणवळण व वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या रस्त्यावरुन रहदारीचे प्रमाण देखील खुप आहे. परंतु तुटलेल्या रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. करमाळा तालुक्यातील जिंती, भिलारवाडी, देलवडी, कुंभारगाव, सावडी, पारेवाडी, दिवेगव्हाण, राजुरी, पोंधवडी, कोर्टी, विहाळ, मोरवड, वीट, रोशेवाडी, वडगाव(द), अंजनडोह, करमाळा, पांडे, फिसरे, हिसरे, मिरगव्हाण, अर्जुननगर, सालसे, आळसुंदे, साडे, गोंडरे, नेरले, कोळगाव व आवाटी या सर्व गावातील ग्रामस्थ व शेतकरी हे या रस्त्यावरुन दररोज प्रवास करीत असून त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता सात दिवसाच्या आत पूर्ण करून द्यावा.अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा जनशक्तीतीचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी दिला.
सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात ते पुढे म्हणाले की, या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. एवढेच नाही तर तालुक्याला येणारे विद्यार्थी, बाजारात फळविक्री करणारे, दवाखान्यासाठी येणारे रुग्ण, ऊस वाहतुक करणारे ट्रॅक्टर व ट्रक यांना या रस्त्याने ये-जा करत असताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून रस्त्यावर पाणी मारले जात नाही. ज्यामुळे दुचाकीने प्रवास करणाऱ्या व इतर प्रवाश्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे व तसेच धुळीने रस्ता दिसत नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहेत.
डांबर प्लांटचे उद्घाटन करुन व फोटोसेशन करुन रस्त्याची कामे पुर्ण होत नाहीत. लोकप्रतिनिधी कडून डांबर प्लांटचे उद्घाटन झाले. परंतु, अद्यापदेखील कामाला सुरुवात झाली नाही. परिणामी याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. एवढेच नाही तर अधिकारी व ठेकेदार यांच्या आर्थिक व्यवहाराच्या मिलीभगतमुळे हा रस्ता अद्यापपर्यंत झालेला नाही.
सदर रस्त्यावरुन कमलाई साखर कारखाना, भैरवनाथ शुगर विहाळ, मकाई सहकारी साखर कारखाना, बारामती अँग्रो, अंबालिका, विठ्ठल शुगर म्हैसगाव या कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी देखील याच रस्त्याचा उपयोग होत असुन रस्ता तुटल्या कारणाने ट्रक, ट्रॅक्टर पल्टी होत आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी अपघातांची संख्या वाढत आहे. तसेच ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होऊन वाहतुक कोंडी होत आहे. हा रस्ता फक्त तालुक्यापुरता मर्यादीत नसून पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा रस्ता आहे. तसेच मुंबई पुणे ते भुम यासाठी देखील हा मुख्य रस्ता आहे. म्हणून या रस्त्याचे काम सुरु करुन त्वरीत पुर्ण करावे. ७ दिवसाच्या आत काम सुरु न केलेस आपले कार्यालयासमोर दि.१८/०२/२०२२ शेतकरी व ग्रामस्थांना घेऊन धरणे आंदोलन करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील याची आपण नोंद घ्यावी. असे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी युवक जिल्हाप्रमुख बाबासाहेब चव्हाण, राणा महाराज, अक्षय देवडकर, रघुनाथ कांबळे, रामराजे डोलारे, संभाजी शिंदे, शरद एकाड, बालाजी तरंगे, जोतिराम तरंगे, अविनाश वाघमारे, अनिकेत वाघमारे, पिनू नरसाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



