श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २१ जोडपी विवाहबद्ध

करमाळा/प्रतिनिधी


श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने करमाळा येथे शनिवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता गोरज मुहूर्तावर श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. यामध्ये २२ जोडपी विवाह बंधनात अडकली. या विवाह सोहळ्यातील वरांची शहरात काढलेल्या घोड्यावरील मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
या विवाह सोहळ्यातील वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब उपस्थित होते. शुभाशीर्वाद देताना जिल्हाधिकारी यांनी कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता, कर्जबाजारी न होता सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या उपवर मुला- मुलींची लग्न लावून देऊन श्रीराम प्रतिष्ठानच्या सामाजिक चळवळीला बळ द्यावे. तसेच श्रीराम प्रतिष्ठानच्या अशा सामाजिक कार्याला आमच्या नेहमी शुभेच्छा व सहकार्य राहील असे प्रतिपादन केले. विवाह सोहळ्यातील नव वधू-वरांना पुढील आयुष्य सुख- समृद्धीचे जावे यासाठी ॲड. गजानन भाकरे यांनी विवाह नंतर वधू-वरांनी आयुष्यात कसे वागावे, नवीन घरात प्रवेश केल्यानंतर वधूंनी सासरच्या मंडळीशी कसे समरस व्हावे. तसेच आरोग्य विषयक जागरूकता, स्त्रीभ्रूण हत्या विरोधी भावना अशा सामाजिक जाणिवांचे समुपदेशन केले.
या विवाह सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, विद्या विकास मंडळाचे विलासराव घुमरे सर, अक्कलकोट चे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, स्वराज साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत निंबाळकर, तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे व तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच -उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन तसेच सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच विवाह सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी मानले.



