
प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)


दिल्ली येथे नीट परीक्षेतील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला करमाळा तालुका बार असोसिएशनने जाहीर पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या नावे तहसीलदार कार्यालयामार्फत निवेदन देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी ज्येष्ठ वकिलांनी सरकारच्या भूमिकेवर टीका करत, विविध आंदोलनांबाबत सरकार मनमानी पद्धतीने वागत असल्याचा आरोप केला. चुकी करणाऱ्यांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
आंदोलनादरम्यान विद्यार्थी व विशेषतः मुलींवर झालेल्या पोलिस मारहाणीचा निषेध व्यक्त करत संबंधित पोलिसांवर कठोर गुन्हे दाखल करावेत आणि जखमी आंदोलनकर्त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही वकील संघाच्या वतीने करण्यात आली.
बार असोसिएशनने दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी संबंधित प्रश्नांवर सरकारने तातडीने चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा, तसेच आंदोलनकर्त्यांवर झालेल्या अत्याचाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. करमाळा तालुका बार असोसिएशनने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून व्यक्त केली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
• संसदेत आंदोलनकर्त्यांशी तातडीने चर्चा करण्यात यावी.
• केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
• आंदोलनकर्त्यांवर अत्याचार करणाऱ्या पोलिस व संबंधित व्यक्तींवर चौकशी करून कठोर कारवाई करावी.
• नीट व इतर परीक्षांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
• आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या तसेच मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी.
• आंदोलनकर्त्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत.




