माय मराठी न्युज


एका रिक्षाचालक तरुणाने अवघ्या दहा रुपयांसाठी प्रवाशाचा जीव घेण्याचे राक्षसी कृत्य केले आहे. ही धक्कादायक घटना औरंगाबाद शहरातील कामाक्षी चौक परिसरात घडली आहे. आगाऊ रिक्षाभाडे दिले नाही म्हणून प्रवाशासोबत झालेल्या वादानंतर, या रिक्षाचालकाने प्रवाशाच्या नाकावर हाताने आणि डोक्याने मारहाण केली. यामध्ये संबंधित प्रवाशी रक्तबंबाळ झाला होता. जखमी प्रवाशाला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. या प्रकरणी आरोपी रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिर्झा मुझफ्फर हुसैन मिर्झा अली हुसैन असे मृत प्रवाशाचे नाव आहे. तर बाबा सुलेमान बावजीर असे अटक करण्यात आलेल्या आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुझफ्फर यांना औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकापासून कामाक्षी चौक परिसरात जायचं होतं. त्यासाठी ते बाबा सुलेमान बावजीर या रिक्षाचालकाच्या रिक्षात बसले. यानंतर कामाक्षी चौक येथे पोहोचल्यानंतर रिक्षाभाडं देताना मुझफ्फर यांचा रिक्षा चालक बाबा सुलेमान बावजीर याच्यासोबत १० रुपयांच्या कारणावरून वाद झाला.
मुझफ्फर यांनी रिक्षा चालक बाबा याला २० रुपये दिले. परंतु, रिक्षाचालकाने आणखी १० रुपये भाडे द्यावे लागतील, असे म्हणत मुझफ्फर यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. अवघ्या दहा रुपयावरून सुरू झालेला हा वाद थेट हाणामारी करण्यापर्यंत पोहोचला. आरोपी रिक्षा चालक बाबा याने हाताने आणि डोक्याने मुझफ्फर यांच्या नाकावर मारून त्यांना जखमी केले. यामुळे त्यांच्या नाकातून रक्त आल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. त्यांच्या डोक्यालाही मार लागला होता.
या घटनेत जखमी झालेल्या मुझफ्फर यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण याठिकाणी पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी मुझफ्फर यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात रिक्षाचालक बाबा याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक याला अटक केली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.cp MT




