
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


मिरगव्हाण ता. करमाळा येथील युवक, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी राज्यात नोकरभरती व्हावी, ज्या परीक्षाचे फॉर्म भरले आहेत त्या परीक्षा लवकर घ्याव्यात, नवीन जाहिरात काढावी अशा विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. सदर निवेदन बुधवार दि. १४ सप्टेंबर रोजी मलबार हिल येथील नंदनवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिले.
‘या’ आहेत प्रमुख मागण्या
▪️जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने एकाच वेळी एकाच दिवशी घेण्यात याव्या, एका संवर्गासाठी राज्यभर एकच प्रश्नपत्रिका असावी.
▪️उमेदवारांची एकाच जिल्ह्यात एकदाच ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी. एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज केलेल्या उमेदवारांचे मेरिट त्यांनी केलेल्या सर्व जिल्ह्यांसाठी ग्राह्य धरण्यात यावे. जे उमेदवार एकापेक्षा जास्त जिल्ह्यात उत्तीर्ण होतील त्यांचेकडून त्यांना हवा असलेल्या जिल्ह्याचे प्रेफ्रन्स मागवित, त्यांच्यामुळे रिक्त होणाऱ्या इतर जिल्ह्यातील पदे निवड यादीतील पुढल्या इतर उमेदवारांमार्फत भरण्यात यावे.
▪️एमपीएससी संयुक्त मुख्य परीक्षेचे वेळापत्रक आधीच जाहीर असताना १५ आणि १६ ऑक्टोबरला जिल्हा परिषदेच्या परीक्षा ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेने आपले वेळापत्रक बदलावे, परंतु बदलेली तारीख ८ ते १५ दिवसांच्या आतली असावी. पुढील तारीख जाहीर करताना किमान MPSC चे वेळापत्रक तपासावे.
▪️फक्त TCS/IBPS या विश्वासू कंपन्यांना काम देण्यात यावे, MKCL या कंपनीने नागपूर विद्यापीठात गोंधळ घातल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे MKCL ला सदर कंत्राट देण्यात येऊ नये.
▪️ या सूचना व SOP असलेला सुधारित शासन निर्णय जाहीर करण्यात यावा आम्ही दिलेल्या सूचना तसेच SOP तंतोतंत पाळण्यात याव्या. नवीन शासन निर्णयात ग्रामविकास विभाग, कंपनी, आणि जिल्हा निवड समितीच्या कामांची विभागणी करून देत सर्वांचे अधिकार क्षेत्र परिभाषित करण्यात यावे.
▪️आरोग्य संवर्गातील भरती तत्काळ घ्यायची असल्याने जिल्हा निवड समिती मार्फत घ्यावी परंतु यापुढील इतर संवर्गाची भरती MPSC मार्फत घेण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करावा व पूर्ण १३,५१४ पदांची भरती पुढील एका वर्षात घेण्याचे नियोजन करावे.
जिल्हा परिषद भरती मध्ये सुरू असलेला गोंधळ, जिल्हा परिषद ची पूर्ण १३,५१४ पदांची भरती, आरोग्य भरती फेरपरीक्षा, प्रलंबित आणि नवीन शिक्षक भरती, भूमी अभिलेख परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती, पेपरफुटीवर विशेष कायदा, एमपीएससी चे वाढीव मागणीपत्र, राज्यसेवेचा नवीन पॅटर्न २०२५ पासून, सर्व विभागातील क्लर्क भरती, एमपीएससी मार्फतच्या फाईलवर निर्णय, सर्व सरळसेवा एमपीएससी मार्फत आदींवर तत्काळ निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी नोकर भरतीवर विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले.
श्री. महेश घरबुडे कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य




