माय मराठी न्यूज नेटवर्क


शेती व मालमत्तेबाबत भावा- भावातील सर्वत्र कमी- अधिक प्रमाणात दिसून येते. मात्र, या वादामुळे जन्मदात्या आई- वडिलांच्या स्थितीकडे कोणीही लक्ष देत नाही. काबाडकष्ट करून जपलेली शेती व संपत्ती व त्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठलेली मुले यामुळे कोंडीत सापडलेल्या खंडाळा येथील वृद्ध दाम्पत्याने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. मुलांच्या शेतीचा वाद कधीतरी थांबेल; परंतु त्यांना पुन्हा कधीही आपले आई- वडील दिसणार नाहीत. ही खंत त्यांना जीवनभर राहील.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामधील खंडाळा येथील गोरखनाथ हरिचंद्र गाडेकर ( वय ५७) व त्यांच्या पत्नी लताबाई ( वय ५६) यांना ज्ञानेश्वर व गणेश अशी दोन मुले व दोन मुली आहेत. पती-पत्नी दोघेही कष्ट करून उदरनिर्वाह करीत होते. सर्व मुलांची लग्ने झाली. त्यानंतर दोन्ही मुले विभक्त झाली. गोरखनाथ यांचेकडे १८ एकर जमीन होती. यामध्ये ७ एकर गणेश आणि ८ एकर ज्ञानेश्वरला देण्यात आली. उर्वरित जमीन गोरखनाथ यांच्या नावावर होती. गोरखनाथ आणि लताबाई दोघेही ज्ञानेश्वरकडे राहत होते. ज्ञानेश्वर यांने वर्षभरापूर्वी त्यांची मावशी मंदाबाई सुखदेव महालकर यांच्याकडून ७ एकर जमीन खरेदी केली होती. मात्र, ही जमीन गणेश सात ते आठ वर्षांपासून बटाईने करीत होता.
दोन भावांमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता. या प्रकरणावरून त्यांच्यात नेहमी भांडणे होत असत. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले होते. मात्र, या भांडणाचा गोरखनाथ व लताबाई यांना त्रास झाला. वारंवार समजावूनही मुले ऐकत नव्हती. गावात तसेच नातेवाईकांमध्येही बदनामी होत असल्याने गोरखनाथ व लताबाई चिंतेत होते. नव्याने घेतलेल्या जमिनीत ज्ञानेश्वर यांनी कांद्याची लागवड केली होती. हे कांदे गणेश हा परस्पर काढून नेत होता. यावरून दोन भावांमध्ये वाद होऊन दोन दिवसांपूर्वी कडाक्याचे भांडण झाले होते. गणेशने ज्ञानेश्वरला काठीने मारहाण करून जखमी केले होते. गणेश विरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे गोरखनाथ आणि लताबाई यांच्या मध्ये मानसिक तणाव निर्माण झाला.
गोरखनाथ आणि लताबाई दोघेही मुलांचे भांडण सहन करू शकले नाहीत. मुले ऐकत नव्हती म्हणून त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी दोघेही आपली दुचाकी काढून गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे पोहोचले. तेथे त्याने चप्पल काढून त्यावर आपले नाव लिहिले. यानंतर गोरखनाथने खंडाळा येथे राहणाऱ्या आपल्या नातेवाईकाला फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत फोन कट झाला होता. यानंतर दोघांनीही गोदावरीच्या पात्रात उडी घेत आपले जीवन संपवले. दोघांवर खंडाळ्यात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.©®mb




