
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने, आ. संजयमामा शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम करमाळा विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात २६ नोव्हेंबर २०२१ रोजी रावगाव येथे करण्यात आली होती. त्यानंतर चे नियोजित कार्यक्रम कोरोना च्या संसर्गामुळे रद्द करण्यात आले होते. सध्या कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यामुळे २२ फेब्रुवारी २०२२ पासून पुन्हा एकदा या उपक्रमाची सुरुवात चिखलठाण नंबर-१ येथून करण्यात आली.
या उपक्रमाचे उद्घाटन करमाळा तालुक्याचे तहसीलदार श्री. समीर माने, गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर चिखलठाण गावचे सरपंच चंद्रकांत काका सरडे, जि.प. चे माजी उपाध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार बारकुंड, तानाजी बापू झोळ, माणिक दादा पाटील, उमेश पाथरूडकर, चंद्रहास निमगिरे, महादेव कामठे, गणेश कानगुडे, सुजित बागल आदी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी कृषी विभागाचे प्रतिनिधी श्री. दत्ता वानखेडे, पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ. होळकर, गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत यांनी आपल्या विभागातील योजनांची व त्याच्या लाभाची माहिती, निकष नागरिकांना सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना तहसीलदार श्री. समीर माने यांनी एकाच छताखाली हा उपक्रम राबविण्यामागील उद्देश समजावून सांगितला. तसेच वर्षानुवर्ष शेतकर्यांच्या सातबारावरती पोटखराब अशी नोंद असते. प्रत्यक्षात ते क्षेत्र वहितीखाली आलेले असते, अशा शेतकऱ्यांनी एक साधा अर्ज द्यावा व आपल्या सातबारा वरील नोंद बदलून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजित बागल व चंद्रकांत काका सरडे यांनी केले. आभार राजेंद्रकुमार बारकुंड यांनी मानले. तर सूत्रसंचालन डॉ. विकास वीर यांनी केले.



