माय मराठी न्यूज नेटवर्क


नवरा आणि बायकोमध्ये वाद होणे ही काही नवी बाब नाही. मग अशाच छोट्या मोठ्या कुरबुरीतून कधी कधी धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातील आंबेगाव पठार परिसरातील सिंहगड व्हिलामध्ये घडली आहे. पतीने मला न विचारताच पाणीपुरी आणल्यामुळे पत्नीने वाद घालत ती पाणीपुरी खाल्ली नाही. त्यातूनच दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि त्याच रागातून पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
प्रतीक्षा गहिनीनाथ सरवदे (वय २३, रा. आंबेगाव पठार) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर गहिनीनाथ अंबादास सरवदे (वय ३३, मूळ रा. पश्चिम मंगळवार पेठ, बुधले गल्ली, सोलापूर, सध्या- आंबेगाव पठार) असे याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहिनाथ आणि प्रतीक्षा यांचा विवाह फेब्रुवारी २०१९ मध्ये झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. गहिनीनाथ हा उच्चशिक्षीत असून, तो एका मोठ्या कंपनीत नोकरी करत आहे. गहिनीनाथ हा नोकरीनिमित्त पुण्यात राहत होता तर त्याची पत्नी प्रतिक्षा ही गावी राहत होती. त्यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत होते. असाच किरकोळ वाद मागील आठवड्यात या पती-पत्नीमध्ये झाला. गहिनाथ याने कामावरून येताना पाणीपुरीचे पार्सल आणले. ‘मला न विचारता पाणीपुरी का आणली’ यावरून प्रतीक्षाने गहिनाथ सोबत वाद घातला.
त्यानंतर पुढील दोन दिवस गहिनाथ कामावर जाताना डब्बा घेऊन जात नव्हता. या दोघांमध्ये त्या दोन दिवसात देखील किरकोळ वाद सुरूच होते. यातून प्रतीक्षा हिने शनिवारी विष प्राशन केले. विष पिल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण, प्रतीक्षाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पती गहिनाथ सरवदे यांस अटक केली असून, पुढील तपास सुरू असल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांकडून सांगण्यात आले.



