माय मराठी न्यूज नेटवर्क


तब्बल १३००० हजार मनसैनिकांना १४९ कलमानुसार नोटिसा, तर १५००० जणांवर कारवाई असा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेवर मनसे कार्यकर्ते ठाम आहेत. पोलिसी नोटिसा आणि कारवाई सुरू होताच अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले आहेत आणि उद्या राज ठाकरे यांच्या आदेशानुसार गनिमी काव्याने मनसे आंदोलन करण्याच्या तयारीला लागली आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात आवाज उठवल्यानंतर महाराष्ट्रातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारने मशिदींवरचे भोंगे उतरवण्या ऐवजी राज ठाकरे आणि मनसे यांच्यावरच कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे मनसेच्या प्रमुख नेत्यांची आणि मनसैनिकांची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांची १४९ ची नोटीस आम्ही स्वीकारली असली तरी आम्ही माघार घेणार नाही. रोज कायदे मोडले जात आहेत. कायदे मोडून मशिदी आणि मशिदींवरचे भोंगे उभारत आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण राज ठाकरे नुसते बोलले तर लगेच पोलिसी नोटिसा आणि कारवाई करत आहेत. हे राज्यातले सरकार मुस्लिमांचे तुष्टीकरण करत आहे, असा आरोप बाळा नांदगावकर यांनी केला आहे. सरकारचा त्यांनी कठोर शब्दात निषेध केला आहे.
राज ठाकरे यांना अजामीनपात्र वॉरंट
राज ठाकरे यांना आधीच २००८ च्या केसचे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. तसेच १३००० मनसैनिकांना नोटीस बजावली असल्याची माहिती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली आहे. १५००० जणांवर कारवाई आणि १३००० जणांना नोटीसा, असे या कारवाईचे स्वरूप आहे.
प्रमुख मनसैनिकांना आणि नेत्यांना मुंबई बाहेर जाण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. मनसेवर चहुबाजूंनी कठोर कारवाईचा बडगा उगारून उद्याची महाआरती हाणून पाडण्याचीच तयारी राज्य सरकारने चालवली आहे. यापुढे महाराष्ट्रात ॲक्शन दिसेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.




