
प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)


महाएनजीओ फेडरेशन व नवभारत प्रतिष्ठान रावगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, रावगाव (ता. करमाळा) येथे पर्यावरणपूरक रक्षाबंधन उपक्रमांतर्गत गोमय रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत पंचगव्य व गाईच्या सेंद्रिय बियापासून तयार करण्यात आलेल्या गोमय राख्या विद्यार्थ्यांना व उपस्थितांना बांधण्यात आल्या. प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूंच्या वापरामुळे वाढणारे प्रदूषण टाळण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक बबन पाटूळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी पर्यावरणपूरक राख्यांचे महत्त्व स्पष्ट करताना जीवनातील गाईचे स्थान व उपयोग यावर मार्गदर्शन केले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष भास्कर पवार, रंजना पवार, मुख्याध्यापक बबन पाटूळे, महेंद्र शिंदे, प्रताप राऊत, रूपाली काळुंखे, विद्या गंभीर, चव्हाण मॅडम, आशाबाई पवार, मधुकर पवार, तसेच भाजपा कामगार सेलचे ज्ञानेश्वर पवार आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार रंजना पवार यांनी मानले.



