दहिगाव योजनेचे पाईप दुसऱ्यांदा जाळले; मोकाट आरोपी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन
अज्ञाताविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


गेल्या पाच सहा महिन्यांमध्ये करमाळा तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असून करमाळा तालुक्याचा बिहार बनू पाहत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील २४ गावांची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम गेल्या ४ महिन्यापासून बंद पाडले गेले आहे. हे कमी म्हणून की काय उजवी लघुवितरीका क्र. ६ वरील बंदनलिका वितरण प्रणालीसाठी आणलेले २८ लाखांचे पाईप आतापर्यंत जाळण्यात आले आहेत. यासंबंधी करमाळा पोलीस स्टेशनला २ वेळेस एफ आय आर ही दाखल केलेला आहे. परंतु अद्यापही आरोपी मोकाटच आहेत. प्रशासनाच्या या कुचकामी धोरण विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला असून येत्या १६ मे रोजी अर्जुननगर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे करमाळा तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांनी दिला आहे.
यावेळी बोलताना अवताडे म्हणाले की, यापूर्वी दहिगाव योजनेचे १४ फेब्रुवारी रोजी १५ लाख रुपये किमतीचे पाईप जाळण्यात आले होते. काल परत ८ मे रोजी १३ लाख रुपये किमतीचे पाईप जाळण्यात आलेले आहेत. लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने करमाळ्याचा बिहार बनवण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून सुरू आहे, परंतु तो आम्ही हाणून पाडणार असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावरती हा प्रकार घातलेला असून करमाळ्याचा बिहार होऊन देणार नाही. त्यासाठी १६ मे रोजी अर्जुननगर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
संबंधित निवेदनाच्या प्रती त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, करमाळा तहसीलदार, करमाळा पोलीस स्टेशन यांना दिलेल्या आहेत.
अज्ञाताविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात दुसऱ्यांदा तक्रार दाखल
दि इंडीयन हूम पाईप कंपनी लि. या कंपनीचे साईट मॅनेजर म्हणून काम पाहत असलेले नचिकेत दिलीप राजमाने यांनी करमाळा पोलीस स्टेशन येथे अज्ञाताविरुद्ध तक्रार दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, दि इंडीयन हूम पाइप कंपनी लि. या कंपनीचे दहिगाव उपसा सिंचन योजनेवरील उजवी वितरीका क्र. ६, मौजे कुंभेज, ता. करमाळा या ठिकाणी ठेवलेले अंदाजे १३,२८,२०८/- रू. किंमतीचे ३१५ एम. एम व्यासाचे ६ केजी प्रेशरचे प्रत्येकी लांबी १२ मीटरचे एकुण ५६ पाईप दि. ०८/०५/२०२५ रोजी दुपारी ०३:०० वा. चे पुर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने विस्तवा सारख्या पदार्थाने जाळून पाईपचे नुकसान केले आहे म्हणुन अज्ञात इसमाविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दोन वेळेस काम बंद पाडले, दोन वेळेस पाईप जाळले हे आता खूप झाले. आमच्या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये दहिगाव योजनेमुळे क्रांतिकारक बदल होऊ लागलेला असताना विध्वंस प्रवृत्तीची मंडळी सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने हे विघातक कृत्य करत असून त्याचा आम्ही जाहीर निषेध म्हणून व दहिगाव योजनेचे काम तात्काळ सुरू करावे यासाठी रास्ता रोको करत आहोत.
आशिष गायकवाड, मा. सरपंच देवळाली.



