
माय मराठी न्यूज नेटवर्क


धरणात जलसाठा उपलब्ध असतानाही शासन आणि प्रशासनाच्या कथित मेहरबानीमुळे अकलूजकरांवर प्रचंड मोठे कृत्रिम जलसंकट निर्माण झाले असून पाच दिवसाआड होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अकलूज शहराबरोबरच यशवंत नगर व संग्राम नगर या गावांसाठी विझोरी येथील तळ्यातून पाणीपुरवठा होतो. या तळ्याची पाणी साठवन क्षमता १९० दशलक्ष मीटर एवढी असली तरी सध्याच्या घडीला त्यामध्ये गाळ साठल्याने १५० दशलक्ष लिटर एवढाच पाणीसाठा त्या तळ्यात होतो. अकलूज, यशवंत नगर व संग्राम नगर या तीन गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रति दिवस १४ दशलक्ष लिटर एवढे पाणी लागते. एकदा तळे भरले की एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास केवळ पंधरा दिवस पाणी पुरते. चार दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास २५ दिवस पाणी पुरते.
असे असताना पाटबंधारे विभागाने उन्हाळी आवर्तन चालू असतानाही तब्बल एक महिना तलाव भरून दिला नाही. त्यानंतर दहा मे रोजी शेवटचे पाणी भरून दिले व १५ जून पर्यंत ते टिकवण्याचे आवाहन केले. वास्तविक पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला तरी तळ्यातील पाणी १५ जून पर्यंत पुरवणे शक्य नसल्याने आताच कृत्रिम दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तिनही गावातील नागरिक पाण्यासाठी वणवण फिरताना दिसत आहेत.
अकलूज नगरपरिषदेमार्फत चार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अत्यंत तोडका ठरत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने नागरिकांच्या जीवाशी न खेळता तात्काळ तलाव भरून देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.
२१२ कोटीची योजना पूर्ण झाल्यास पाणी समस्या निर्माण होणार नाही
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून अकलूज साठी २१२ कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून ७७ मैल येथून विझोरी तलावात थेट पाईपलाईन मधून पाणीपुरवठा होणार आहे. शिवाय तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार असून यामुळे नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.




