महायुतीचे सरकार लोकसभेच्या जागा वाटपात व्यस्त, शेतकरी मात्र लाईट मुळे त्रस्त- गणेश इंगळे
माय मराठी न्यूज नेटवर्क


भिमा नदी काठावरील शेती पंपाचा वीजपुरवठा गेली अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीने चार तास केला आहे. त्यामुळे शेतकरी अगोदरच दुष्काळामुळे मेटाकुटीस आला आहे. आणि आता शेतपंपाची वीज चार तास केल्यामुळे आहे ती शेतातील पिके ही जळून गेल्यावर शेकऱ्यांसमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही.
आपल्या कृषि प्रधान देशात शेतकऱ्यांच्या शेतीची वीज बंद करून जर शेतकऱ्यास आत्महत्या करण्यास प्रशासन प्रवृत्त करित असेल तर याहून दुर्दैवी गोष्ट नाही. भिमा नदी काठावर माळशिरस तालुक्यात कोणत्याही प्रकारच्या पाणी पुरवठा योजना नाहीत किंवा दुष्काळासाठी कोणत्याही प्रकारचे पाण्याचे टँकर चालू नाहीत. त्यामुळे भिमा नदी मध्ये जे शिल्लक राहणारे पाणी आहे ते भाष्पीभवन होऊन उडून जाऊ शकते. त्यामुळे कमीत कमी ते पाणी शेतकऱ्यांच्या उपयोगी तरी यावे. त्यासाठी भिमा नदीकाठावरील वीजपुरवठा तात्काळ आठ तास किंवा शक्य नसेल तर सहा तास तरी चालू करावा. अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. या निवडणुकीच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार यांना जगाचा पोशिंदा शेतकरी राजाकडे बघण्यास थोडा देखील वेळ नाही. हेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ओरडून सांगतात हे सरकार जनतेच सरकार आहे, हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. तर मग शेतकऱ्यांची वीज कमी करून चार तासावर का आणली? शेतकऱ्यावरती आत्महत्यास प्रवृत्त का करत आहात? सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री आहेत का नाहीत? जर असतील तर त्यांना भिमा नदीकाठावरील शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकायला येत नाही का? असे सवाल युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी उपस्थित केले आहेत.




