
प्रतिनिधी/मच्छिंद्र वाघमारे


कुर्डूवाडी शहरातील काही भागात गढूळ पाणी पुरवठा होत असून या पाण्याचा दुर्गंधीयुक्त वास येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. पालिकेने शुध्द पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कुर्डूवाडी शहरांमध्ये गेले अनेक दिवसापासून ३ ते ४ दिवसांनी नळाला पाणी सुटते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणाने घरामध्ये पाणी जास्त प्रमाणात वापरले जाते. तसेच उन्हाळा असल्यामुळे पाणी पिण्यासाठी देखील जास्त प्रमाणात वापरले जात आहे. आपण या गोष्टीकडे जातीने लक्ष घालून किमान एक दिवसात तरी योग्य पद्धतीने पाणी सोडण्यात यावे, काही भागात पाणी गढुळ येत असल्याबाबत आमच्या निदर्शनास आले आहे. तरी आपण या गोष्टीकडे देखील अतिदक्षता म्हणून लक्ष घालून गढूळ पाणी न येण्याबाबत योग्य ती तजवीज करावी. नाही तर त्यामुळे शहरात रोगराई पसरेल म्हणून यांची सुद्धा आपण जातीने लक्ष देऊन योग्य तो उपाय लागलीच करावा. पाणीपुरवठा अधिकारी यास वेळोवेळी सूचना देण्यात यावी. वरील गोष्टीकडे जातीने लक्ष घालावे अन्यथा जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल भाऊ खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी सौ. रेश्मा दिवे कुर्डूवाडी शहर महिला आघाडी कार्याध्यक्षा, सौ. सुनीता किशोर नाळे, कुर्डूवाडी शहर महिला आघाडी माधुरीताई टोणपे, तालुका प्रमुख महिला आघाडी उर्मिला कोळी, राणी लोंढे आदीसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.



