अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा; आ. शिंदे यांच्या तहसील व कृषी अधिकाऱ्यांना सूचना

करमाळा/प्रतिनिधी


शुक्रवार दि. २८ एप्रिल रोजी अचानक उद्भवलेल्या वादळामुळे व अवकाळी पावसामुळे करमाळा तालुक्यातील अनेक गावातील केळी, पपई, आंबा, लिंबोणी आदी फळबागा बरोबरच तरकारी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेले असून वादळात झाडे अंगावर पडून काही जनावरेही मृत झालेली आहेत. सदर पिकांचे व मृत जनावरांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा अशा सूचना करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रभारी तहसीलदार मा. विजयकुमार जाधव, तालुका कृषी अधिकारी श्री. संजय वाकडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. शिंदे यांना दिलेल्या आहेत.
दि. २८ एप्रिल रोजी दुपारनंतर करमाळा तालुक्यातील चिखलठाण, शेटफळ, वाशिंबे, उमरड, देवळाली, सरपडोह आदी जवळपास ३०-३५ गावांमध्ये वादळामुळे व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर ती नुकसान झाल्याचा अंदाज आहे. संपूर्ण तालुक्यातील नुकसानीचा सर्वे करून त्याचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावे. अशा सूचना आमदार शिंदे यांनी दिलेल्या आहेत.
अंदाजे ६०० हेक्टर क्षेत्र बाधित – श्री. संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी
महसूल विभागाकडून आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष पंचनामे सुरू आहेत. तालुक्यातील कमी अधिक प्रमाणामध्ये नुकसान झालेल्या सर्वच गावातील पिकांचे पंचनामे केले जातील. अंदाजे १२०० शेतकरी व ६०० हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र कालच्या अवकाळी पावसामुळे व वादळामुळे बाधित झाल्याचा अंदाज आहे. संपूर्ण पंचनामे झाल्यानंतर ३-४ दिवसांमध्ये एकूणच नुकसानग्रस्त क्षेत्राचा व पिकांचा अंदाज येईल.



