
करमाळा/प्रतिनिधी


करमाळा येथील यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे कर्मचारी श्री दादासाहेब पिसे यांना गेल्या काही वर्षापासून कविता लिहिण्याचा छंद जडला. भरपूर वाचन व अभ्यासु व्यक्तिमत्व असणारे पिसे यांनी सामाजिक, राजकीय, हुंडाबळी, प्रेमभंग, विरह, आनंद, मैत्री, महापुरुष अशा विविध विषयांच्या कविता केल्या. त्यांच्या या काव्यातून त्यांनी सामाजिक प्रबोधन करत आज पर्यंत तीन हजार कविता लिहिल्या आहेत.
दादासाहेब सुभाष पिसे यांचे मुळगाव पंढरपूर तालुक्यातील आनवली हे असून ते मेकॅनिकल ड्राफ्ट्समन होते. परंतु मूळ व्यवसाय शेती असल्यामुळे त्यांनी शेती करण्यावरती भर दिला होता. त्यानंतर ते करमाळा येथील यश कल्याणी सेवाभावी संस्थेमध्ये कर्मचारी म्हणून रुजू झाले. त्यांना कविता लिहिण्याचा खरा छंद सन २०१९ पासून लागला. यानंतर त्यांनी सलग चार वर्षे कविता लिहीत ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ३००० कविता लिहिण्याचा एक विक्रमच केला. विशेष म्हणजे कविता करण्याच्या छंदाने त्यांना गीतांची रचना करण्यासही भाग पाडले.
कवी दादा पिसे यांना प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी मोलाचे योगदान दिले ते म्हणजे करमाळा येथील प्रसिद्ध पार्श्वगायक, गीतकार व संगीतकार प्रवीणकुमार अवचर यांनी, तसेच त्यांच्या या लेखणीला बळ देणारी व्यक्तिमत्त्व म्हणजे त्यांचे मित्र रमेश नामदे गुरुजी, दयानंद चौधरी सर, खलील शेख, दीपक लांडगे, प्रकाश लावंड यांचे ही मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन राहिले. सर्वात महत्त्वाचे मार्गदर्शन म्हणजे त्यांच्या काव्य लेखणीला चालायला, बोलायला लावणारे यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक श्री गणेश भाऊ करे पाटील यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
श्री दादा पिसे यांचे अनोख्या काव्य विक्रमाची करमाळा तालुक्यातून प्रशंसा होत आहे.



