आदिनाथ सहकारी तत्त्वावर चालण्याचा मार्ग मोकळा; कर्जाची पुनर्बांधणी करून देण्याची शिखर बँकेची मान्यता
रोहित पवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दणका; नारायण पाटील व रश्मी बागल यांच्या एकत्रित प्रयत्नाला यश
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


सुमारे ३०० कोटी रुपयांची प्रॉपर्टी असलेला व ऊस पट्ट्यात उभा असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेपट्ट्याद्वारे ताब्यात घेऊन राजकीय वर्चस्व करमाळा तालुक्यात प्रस्थापित करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी जंग जंग पछाडले होते. अनेक कायदेशीर प्रक्रियेतून आदिनाथ ला अडचणीत आणून आदिनाथ कारखाना बळकवण्याचा रोहित पवारांचा डाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी उधळून लावला आहे. आज डीआरटी कोर्टामध्ये शिखर बँकेच्या वतीने २ कोटी ७० लाख रुपये कर्ज खात्यात भरून आदिनाथ कारखान्याला स्वतः कारखाना सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.
गेली तीन वर्षापूर्वी आदिनाथ कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्याने लिलाव प्रक्रियेत घेतला होता. मात्र लिलाव प्रक्रिया पूर्ण न करता बारामती ॲग्रोने हा कारखाना तीन वर्षे बंद ठेवला. यामुळे करमाळा तालुक्यातील जनतेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
आदिनाथ कारखाना सभासदांच्या मालकीचा राहण्यासाठी रश्मी बागल कोलते यांनी आदिनाथ कारखाना बचाव समितीच्या सदस्यांशी समन्वयाची भूमिका ठेवून बारामती ॲग्रोला भाडे कराराने कारखाना देण्याची प्रक्रिया विशेष सर्वसाधारण सभा घेऊन रद्द केली.
यावर बचाव समितीने शिखर बँकेशी संपर्क साधून कारखान्याची बाजू मांडली. नंतरच्या झालेल्या राज्यातील सत्ता बदलानंतर आमदार नारायण पाटील यांनी पुढाकार घेऊन स्वतः एक कोटी रुपये कारखान्याच्या खात्यात भरून ती रक्कम शिखर बॅंकेकडे वर्ग करून उर्वरित रक्कम भरण्याची तयारी दर्शवली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी संपर्क साधून नारायण पाटील व आदिनाथ चे चेअरमन धनंजय डोंगरे, बचाव समितीचे अध्यक्ष हरिदास डांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य ती विव्रचना करून न्यायालयात वकिलामार्फत आपली बाजू मांडली. आजच्या या निकालामुळे करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आता सहकार तत्त्वावर हा कारखाना लवकरात लवकर चालू व्हावा. यासाठी तालुक्यातील सर्व नेते मंडळींनी गट तट विसरून काम करावे अशी भावना सभासदांना गुंतत आहे.
आदिनाथ कारखाना सुरू व्हा ही आमच्या सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे. आता सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून राजकीय जोडे बाहेर ठेवून आदिनाथ कारखाना सुरू करून करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
सौ. रश्मी बागल कोलते, संचालिका, आ.सह.सा. कारखाना
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर आदिनाथ कारखाना आपल्या सहकाराच्या मालकीचा राहू शकतो हे आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही प्रयत्न केले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, प्राध्यापक आमदार राम शिंदे, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केलेल्या विशेष मदत व सहकार्यामुळे ही गोष्ट घडू शकली.
मा.श्री. नारायण पाटील माजी आमदार, करमाळा
बचाव समितीने केलेल्या प्रयत्नाला आता यश आले असून आता रक्ताचे पाणी करून हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कारखान्यातील उर्वरित सर्व साखर विक्री करून भांडवल उभा करू व कारखाना नक्कीच व्यवस्थित सुरू करू.
श्री. हरिदास डांगे, अध्यक्ष, आदिनाथ बचाव समिती.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत यांच्या समवेत पंढरपूर येथे आदिनाथच्या विषयावर चर्चा झाली होती. तेथून थेट शिंदे साहेब यांनी शिखर बँकेच्या अनास्कर साहेब यांना फोन करून आदिनाथ ला मदत करा येत्या गळीत हंगामाची साखर कारखान्याची मोळी टाकायला कारखान्याला जाणार आहे. अशा शब्दात सूचना दिल्यामुळे सर्व प्रश्न सुटले.
श्री. महेश चिवटे उपजिल्हाप्रमुख शिवसेना (शिंदे गट)




