प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


राष्ट्रपुरुषांच्या यादीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा समावेश करावा. तसेच त्यांची प्रतिमा सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये लावण्यात यावी. अशी मागणी शिवप्रताप युवा प्रतिष्ठानचे संस्थापक शंभुराजे फरतडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे इमेल द्वारे पाठवलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात फरतडे यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण करण्याचे व हिंदुधर्मासाठी बलिदान देण्याचे अफाट शौर्य छत्रपती संभाजी महाराजांनी केले आहे. अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे संभाजी महाराज हे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ देखील लिहीला आहे. मात्र अशा थोर राजाचा राष्ट्रपुरुषांमध्ये समावेश नाही हे दुर्दैव असल्याचे फरतडे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रपुरुषांच्या यादीत जवळपास ४० थोर पुरुषाच्या नावाचा समावेश आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराजां सारख्या चारित्र्यवाण, नितीवंत, स्वराज्य रक्षक, महा पराक्रमी राजाचं नाव राष्ट्रपुरुषाच्या यादीत नसल्याची खंत शिवशंभु भक्तामधुन अनेक वर्षांपासून व्यक्त होत आहे. मात्र याचा सरकारकडून गांभीर्यपूर्वक विचार केला जात नाही. शिवसेना भाजपाचे सरकार असताना सुद्धा व त्या पुर्वी देखील अनेक वेळा शिवशंभु भक्तांनी हि मागणी केली आहे. मात्र आजपर्यंत या मागणीचा सरकारकडून गांभीर्यपूर्वक विचार झालेला नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदु धर्माचे पुरस्कर्ते आहेत व ते सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तसेच सामान्य प्रशासन खात्याचे स्वतः मंत्री आहेत. त्यामुळे शिवशंभु भक्तांच्या भावनेचा विचार व्हावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर शिवप्रताप युवा प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष ओंकाराजे निंबाळकर तालुकाध्यक्ष महेश काळे पाटील आदींच्या सह्या आहेत.




