प्रतिनिधी/संजय जाधव


केम तालुका करमाळा येथील मावळा ग्रुप व धर्मवीर संभाजी राजे मित्र मंडळ केम यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ३६५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त रक्तदान शिबिर, शंभूराजांच्या चरित्रावर व्याख्यान, मर्दानी खेळ, पालखी सोहळा व भव्य मिरवणूक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ०८:०० वा. शिवशंभो प्रवेशद्वार येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुर्तीस दुग्धाभिषेक करून पूजा करण्यात आली.
यानंतर सजवलेल्या पालखीमध्ये राजे छत्रपती संभाजी महाराज यांची मुर्ती ठेवून गावातुन पारंपरिक पद्धतीने “पालखी सोहळा” काढण्यात आला. या पालखी सोहळ्यामध्ये तरूणांनी हातात भगवे झेंडे घेऊन हलगी व तुतारीच्या आवाजात पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. पालखी सोहळ्यामध्ये केम येथील स्वराज्य मैदानी खेळ संस्थेचे संस्थापक अक्षय तळेकर यांच्या टीम ने शिवकालीन खेळातील तलवार, दांडपट्टा, भाला, चक्र, लाठीकाठी तसेच तलवारीने पोटावरील सफरचंद, लिंबू कापणे अशी थरारक प्रात्यक्षिक करून दाखवले. हा खेळ पाहताना नागरिक श्वास रोखून खेळ पहात होते. या खेळात हिंदवी तळेकर, प्रिया चेंडगे, सौरभ मोरे, सिद्धी तळेकर, सानिका मोरे, अमृता काळे यांनी सहभाग नोंदवला. हा खेळ पाहून नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. हा खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी चौकात गर्दी केली होती. पालखी सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर सोहळ्याची सांगता झाली.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शंभूराजेंच्या चरित्रावर व्याख्याते शिवश्री कदम सर (पाटोदा, बीड) यांचे मनतृप्त असे व्याख्यान झाले. यानंतर पावनखिंड चित्रपटात बांदल यांची भूमिका साकारणारे गणेश टावरे यांनी पावनखिंड चित्रपटातील अनुभव सांगितले. तसेच सकाळी १०:०० ते सायं.०५:०० या वेळेत श्री राम मंदिर येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. या रक्तदान शिबिरात एकूण ५१ शंभूभक्तांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांना मावळा ग्रुप केम आणि धर्मवीर संभाजी राजे मित्र मंडळ यांच्या वतीने “छत्रपती संभाजी राजे” यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी दत्ता भाऊ तळेकर, गणेश आबा तळेकर, समीर तळेकर, सागरराजे तळेकर, सचिन जाधव, ओंकार जाधव, विष्णूपंत तळेकर, राजेश तळेकर, विक्रम तळेकर, ज्ञानेश्वर तळेकर, मदन गायकवाड, विशाल ओहोळ, अमोल तळेकर सर, राकेश दोंड, सज्जन पाटील, ओंकार आवताडे, अभयसिंह तळेकर, विकास कळसाईत, दिपक भिताडे, राहुल कोरे, महेश तळेकर, गणेश नागणे, केतन जाधव, मंगेश देवकर,तेजस तळेकर, गोवर्धन बोंगाळे, गोडगे आदींनी परिश्रम घेतले.




