प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ चा अंतिम निकाल दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी जाहीर झाला. या परीक्षेमध्ये करमाळा तालुक्यातील करंजे येथील अभयसिंह बाबासाहेब पाटील व ऋतुजा मिनीनाथ सरडे यांची सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून तर संभाजी बनाजी पवार यांची जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे. हे तिनही विद्यार्थी करंजे या गावातील आहेत.
अभयसिंह पाटील हे सध्या जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून सिना कोळेगाव प्रकल्पावर कार्यरत आहेत. त्यांची या पदावर एम पी एस सी २०१७ मधून निवड झाली आहे व आता ते सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये रुजू होतील. त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय, रायगाव या शाळेचे मुख्याध्यापक होते. ते सध्या सेवा निवृत्त झाले आहेत.
संभाजी बनाजी पवार हे सध्या रेल्वे डिपार्टमेंट मध्ये ज्युनिअर इंजिनिअर या पदावर मोहोळ येथे कार्यरत असून त्यांची २०२० मध्ये या पदावर निवड झाली होती आणि ते आता जलसंपदा विभागात रुजू होत आहेत. संभाजी पवार यांचे वडील श्री. बनाजी पवार हे वडिलोपार्जित शेती व्यवसाय करतात.
ऋतुजा मिनीनाथ सरडे या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये रुजू होतील. ऋतुजा सरडे यांचे वडील श्री. मिनीनाथ सरडे हे आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांमध्ये कामावर आहेत. हे तिनही विद्यार्थी ग्रामीण भागातील असून त्यांनी एम.पी.एस.सी. मध्ये घवघवीत यश संपादित केले आहे. त्यांच्या या यशामध्ये त्यांचे आईवडील, नातेवाईक, गावातील नागरिक आणि शिक्षकांचा मोठा हातभार आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नक्कीच यांच्याकडून प्रेरणा घेऊन असे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून घडतील.



