माय मराठी न्युज नेटवर्क


ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी पहिल्यांदाच शिवाजी पार्कवरील लता मंगेशकर स्मारकाच्या वादावर भाष्य केलं आहे. “आम्ही मंगेशकर कुटुंबीयांनी या वादात भाग घेण्याचं काहीही कारण नाही. कारण, दीदींच स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावं ही आमची इच्छा नाही.” असं स्पष्ट मत हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केलं आहे. तसेच राजकारणी लोकांनी दीदिंच्या स्मारकावरील वाद कृपया बंद करावा, असं आवाहनही त्यांनी केल. ते एबीपी माझा शी बोलत होते.
पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले की, “भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे आमची दीदी हिच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली, ती पोकळी आकाशा एवढी मोठी आहे. त्या आकाशाच्या पोकळीत अनेक गंगा ओतल्या तरी ती पोकळी भरून निघणार नाही. लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून सुरू असलेल्या या वादात आम्ही मंगेशकर कुटुंबीयांनी भाग घेण्याचे काहीही कारण नाही. कारण दीदींचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावं ही आमची इच्छाच नाही.”
“दीदींच्या बाबतीत कृपया राजकारण करू नये. श्रद्धेला श्रद्धांजली वाहण्याची आवश्यकता नसते. लता मंगेशकर गेल्याने एक संगीत पर्व संपलय, एक युगांत झालाय.” असही त्या यांनी नमूद केलं.
“आमचं म्हणणं आहे की, शिवाजी उद्यानाच्या स्मारकावरून राजकारणी लोकांचा जो वाद चालला आहे, तो त्यांनी कृपया बंद करावा. दीदीच्या बाबतीत कृपया राजकारण करू नये. दीदींच्या संगीत स्मारकापेक्षा अन्य कुठलंही मोठं स्मारक नाही.”
हृदयनाथ मंगेशकर पुढे म्हणाले, “महाराष्ट्र शासनाने दीदीला लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याचं आश्वासन दिलं होतं. स्वतः लता मंगेशकर यांनी त्यांना त्याबाबत विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ही मागणी अतिशय आनंदाने मान्य केली होती. त्याची सर्व पूर्वतयारी यांनी केली आहे. तीच संगीत स्मारक होतंय यापेक्षा अन्य कुठलेही मोठे स्मारक होऊ शकत नाही.”




