माय मराठी न्युज नेटवर्क


पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमन म्हणून कार्यरत असलेले नामदेव सुखदेव गवळी यांनी जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधुन १००० पत्र वाटपाचा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. सर्व पत्रे लिहून वाटण्यासाठी साधारण एक आठवड्याचा कालावधी लागणार आहे.

१००० पत्र वाटपाचे कारण वाचा त्यांच्याच शब्दात….
मागे एकदा मी एका ठिकाणी पत्रं घेऊन गेलो होतो.. तेव्हा त्या यजमानांनी मला म्हणजे पोस्टमनला पाहून आश्चर्य व्यक्त केले.. ‘पोस्ट ऑफिस अजूनही चालू आहे ? बापरे किती वर्षानंतर पोस्टमन पाहतोय मी..आणि ते पोस्टकार्ड तर कालबाह्यच झालं असेलं ना..?’ त्या यजमानांच्या प्रश्नांनी मला भांडावून सोडले…
जूने पत्रं, त्याच्या मखमली मोरपीशी आठवणी हरवून जावू नयेत असे राहून राहून वाटतं होते.. तेव्हाच मनाशी एक सुग्रास बेत पक्का केला.. आपण स्वतःहून एक हजार लोकांना पत्रं लिहायची.. त्यांना जून्या दिवसांची आठवण करून द्यायची.. ठरल्याप्रमाणे काल दि. ०८/१०/२०२१ पासून लोकांना मी लिहिलेली पत्रे वाटायला सुरुवात केली… जूने पत्र हातात पडल्यानंतर लोकांच्या भावना शब्दातीत होत्या.. काहींना गहिवरून आले.. तर काहींनी कौतुक केले..

पत्र भेटलेल्या व्यक्तीचे मनोगत
नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे पत्रं घेऊन येणारे पोस्टमन आज चक्क जूनं, बालपणीचं, ख्याली – खुशालीचं पत्रं घेऊन आले. क्षणभर काय बोलावे ते सुचेना.. पण, खर्या अर्थाने जून्या दिवसांची प्रकर्षाने आठवण झाली.. आता तर ही पत्रं नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.. अशावेळी आपला जूना आठवणींचा ठेवा जपून ठेवण्यासाठीचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.
विनोद हनुमंतराव जाधव




