माय मराठी न्युज


गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणू ने संपूर्ण जगाबरोबरच आपल्या देशात ही थैमान घातले आहे. कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत व आता तिसऱ्या लाटेची चिंता सतावत आहे. या काळात कोरोना संसर्गामुळे भारतामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आता मुंबई मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तीन महिन्यात दोन वेळा covid-19 चा संसर्ग झाल्याच्या नैराश्यातून एका नवदाम्पत्याने आत्महत्या केली आहे. या जोडप्याने मध्य मुंबईतील भारत मिल्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये विष प्राशन करून आपले जीवन संपवले आहे.
त्यांचे मृतदेह ताब्यात घेणाऱ्या वरळी पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, या जोडप्याने आत्म्हत्या करून मागे सुसाईड नोट सोडली आहे. ज्या मध्ये नमूद केले आहे की, गेल्या तीन महिन्यात दोन वेळा covid-19 विषाणूचा संसर्ग झाल्याने आम्ही आत्महत्या करत आहोत. अजय कुमार आणि सुजा अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे असून दोघेही केरळ येथील रहिवाशी होते. यांचा अवघ्या 10 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. ते वरळीतील भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्ये राहत होते.
वरळी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी म्हणाले की, अजय नवी मुंबईत एका खाजगी कंपनीत काम करत होता तर त्याची पत्नी सुजा फोर्टमध्ये एका बँकेत नोकरी करत होती. या जोडप्याला एप्रिल मध्ये covid-19 ची लागण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये विषाणूची लक्षणे दिसू लागली होती. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली.
सुजाच्या आईने तिच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फोन उचलला गेला नाही. त्यानंतर सुजाच्या आईने त्याच इमारतीत राहणाऱ्या तिच्या एका मित्राकडे चौकशी केली. मित्र त्यांच्या घरी गेला पण आतून कोणीही दरवाजा उघडला नाही, त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी सुजाचा मृतदेह लिव्हींग रूम मध्ये आढळला तर अजयचा मृतदेह स्वयंपाक घरात आढळून आला. त्यानंतर या दोघांना तातडीने नायर इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. कोळी म्हणाले की, शवविच्छेदन अहवालात त्यांनी स्वतः विष प्राशन केले असल्याचे दिसून आले आहे.




