केम प्रतिनिधी


करमाळा तालुक्यातील केम येथे रेल्वे उड्डाणपूल व रस्ता करावा अशी मागणी केमचे सुपुत्र जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या नेतृत्वाखालील केम येथील शिष्टमंडळाने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे कडे समक्ष लेखी निवेदन देऊन करण्यात आली आहे.
कुर्डुवाडी येथे खासदार निंबाळकर हे बैठकीस आले असताना त्यांच्याकडे दिलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, सोलापूर मंडळ अंतर्गत केम रेल्वे स्टेशन आहे. केम गावची लोकसंख्या बारा हजाराच्या पुढे असून या गावाच्या आसपास दहा ते बारा खेडी आहेत. या खेड्यातील आवक, जावक केम येथील दळणवळणावर अवलंबून आहे. केम येथे वीस ते बावीस लहान मोठे कुंकू कारखाने आहेत. हे कारखाने दळणवळणासाठी रेल्वे वर अवलंबुन आहे. सध्या केम येथे एकही राज्यमार्ग किंवा महामार्ग नाही. त्यामुळे कुंकू कारखाने उद्योगावर परिणाम होत आहे. केम येथील बीड- सरमकुंडी- भूम- परांडा- रोपळे -केम -दहिवली -वेणेगाव फाटा या रस्त्यास राज्यमार्ग मान्यता मिळावी. तसेच रेल्वे चेनेज ३५७/१ येथे रेल्वे उड्डाणपूल करावा अशी मागणी केली आहे.
केम हे गाव करमाळा शहरापासून ३२ कि.मी अंतरावर व कुर्डुवाडी पासून ३० कि.मी अंतरावर आहे. या दोन्ही शहरातून येणाऱ्या रस्त्यावर केम स्टेशन लगत गावाजवळ आल्यानंतर रेल्वे पूल असून तो लहान असल्याने येथून मोठी वाहने येत नाहीत. कुंकू कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल बाहेरून आणावा लागतो. त्या गाडया या नाल्यात बसत नसल्यामुळे टेंभूर्णी मार्गे आणाव्या लागतात. त्यामुळे भाडे जास्त लागते व पक्का माल तयार झालेला संपूर्ण देशात पाठविला जातो. येथे मोठा रस्ता नसल्याने गाड्या येत नाहीत. दळणवळणा अभावी केम येथील कुंकू कारखाने टेंभूर्णी, पंढरपूर, जेजुरी, तुळजापूर येथे स्थलांतरित होऊ लागले आहेत. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तरी माननीय खासदार साहेबांनी जातीने लक्ष घालून केम येथील उड्डाणपूल व रस्ता करावा अशा मागणीचे निवेदन केम येथील शिष्टमंडळाने दिले आहे. या शिष्टमंडळात कुंकू कारखानदार मनोज सोलापूरे, आप्पा वैद्य, राजाभाऊ गोडसे, सचिव मिलिंद नरखेडकर, सागर गोडसे आदी उपस्थित होते.



