करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


महाविकास आघाडी सरकार कडून लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज बिल वसुल करण्याचे आणि वसुली नाही झाली तर वीज जोडणी तोडण्याचे आदेश महावितरणला देण्यात आले आहेत.
सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची उसाची बिले अद्यापही मिळालेली नसताना अगोदरच हतबल झालेला शेतकरी अडचणीत सापडला आहे. असे असतानाही सरकारने पुन्हा एकदा वीजबिल वसुलीचे आदेश महावितरणला दिलेले आहेत. ते आदेश त्वरित रद्द करावेत या मागणीसाठी आज करमाळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार श्री समीर माने यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी तालुका सरचिटणीस नगरसेवक महादेव फंड, शशिकांत पवार, अमरजीत साळुंखे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, किसान मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण केकान, आरपीआय (A) चे तालुका अध्यक्ष अर्जुन गाडे, रासप तालुकाध्यक्ष अंगद देवकते, संजय गांधी निराधारचे नरेंद्र ठाकूर, रेल्वे सल्लागार सदस्य दिपक चव्हाण, मकाई कारखान्याचे मा संचालक अमोल पवार, व्यापार आघाडी अध्यक्ष जितेश कटारिया, युवा मोर्चाचे मयूर देवी, संतोष कांबळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.




