-->
आरोग्यकरमाळाकृषी विषयकराजकिय

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे श्रेय घेणे हास्यास्पद; अतुल खूपसे यांचा पाटील, बागल गटाला टोला

सावंत बंधूमुळेच 'आदिनाथ'चं धुराडं पेटलं- खुपसे-पाटील

 

 

प्रतिनिधी/मच्छिंद्र वाघमारे

 

शेतकऱ्यांचे मंदिर असणारा करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना पवार कंपनीच्या जवळजवळ घशात गेलाच होता. मात्र वेळीच सावंत बंधू शेतकऱ्यांच्या हितासाठी धावून आले. शेतकऱ्यांचे आणि कामगारांचं हे मंदिर अबाधित रहावं यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. प्रा. शिवाजीराव सावंत यांनी ग्राउंड लेव्हल वरची धुरा सांभाळली तर मंत्री तानाजीराव सावंत यांनी मंत्रालयीन बाजू सांभाळली आणि म्हणूनच कारखान्याचे धुराडं खऱ्या अर्थाने पेटलं. याचं सर्व श्रेय फक्त सावंत बंधूंना जातं. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणीही कारखान्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. असे परखड प्रतिपादन जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे-पाटील यांनी केले आहे.

 

आयोजित पत्रकार परिषदेत पुढे बोलताना ते म्हणाले की, आदिनाथ कारखान्याच्या निर्मितीसाठी स्व. गोविंदबापू पाटील यांनी मोठा त्याग केला होता. हे तालुक्यातील जनतेला सर्वश्रुत आहे. त्यानंतर कारखान्याची सत्ता ‘या’ अथवा ‘त्या’ गटाच्या ताब्यात गेली खरी. मात्र कारखाना कोणालाच व्यवस्थितरित्या चालवणे जमले नाही. ‘कुत्र्यानं पोत फाडावं’ अशीच अवस्था कारखान्याची झाली होती. यामुळे टपून बसलेल्या पवार कंपनीने कारखाना स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून मोठा जनआक्रोश पाहायला मिळाला. केवळ शेतकऱ्याच मंदिर वाचावं यासाठी कोणतीही राजकीय महत्त्वकांक्षा न बाळगता, स्वतःचा मतदारसंघ नसताना देखील शेतकरी व कामगारांच्या हितासाठी त्यावेळी मंत्री तानाजीराव सावंत यांनी कराराचे एक कोटी रुपये भरले, तर त्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून ९ कोटी रुपये उपलब्ध करून कारखाना सुरळीत सुरू केला. सलग तीन वर्षे बंद असलेल्या या कारखान्याची मोळी टाकण्यासाठी दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

 

त्यामुळे पवारांच्या घशातून काढत कारखाना फक्त शेतकऱ्यांचा राहील यासाठी प्रयत्न करणारे सावंत बंधू हेच होते आणि तेच राहतील. यापुढे देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज राहिले तर तो सुरळीत राहील. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उगीचच राजकीय स्टंटबाजी करत बागल अथवा पाटील गटाचा श्रेय घेण्याचा खटाटोप हास्यास्पद वाटतो. असा टोला त्यांनी लगावत सावंत बंधू हेच कारखाना सुरू होण्यामागचे कर्ते करविते असल्याचा पुनरुच्चार त्यांनी आवर्जून केला.

 

यावेळी गणेश वायभसे, राणा वाघमारे, अतुल राऊत, रामराजे डोलारे, बालाजी तरंगे, अभिषेक राऊत, मंगेश बदे, हनुमंत कानतोडे, गणेश वायभासे, शरद एकाड, पांडुरंग भासले, अजिज शेख, भाऊसाहेब जाधव, शहाजी रिटे, साहेबराव विटकर, नवनाथ ढेरे, अविनाश महाराज कोडलिंगे, अभिजीत नवले, वैभव मस्के, बंडु शिंदे आदी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close