
करमाळा/प्रतिनिधी


करमाळा शहरातील श्रीराम प्रतिष्ठान हे हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असल्याचे मत अँड. अलीम पठाण यांनी यांनी व्यक्त केले आहे. श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेच्या कार्यालयातील गणपतीची आरती त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली, यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी अधिक बोलताना ते म्हणाले की, करमाळा म्हणलं की सोलापूर जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला तालुका समजला जातो. प्रत्येक वर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी करमाळा शहरातील जामा मशिदीवरून गणरायाच्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली जाते. तसेच मुस्लिम धर्मामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान ईद निमित्त हिंदू बांधवांकडून ठिक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते, हे करमाळा तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे श्रीराम प्रतिष्ठान हेही हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरले आहे. श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने गरिब मुस्लिम बांधवांसाठी रमजान ईद निमित्त मोफत दूध वाटप केले जाते. तसेच सर्वधर्म समभाव म्हणून करमाळा शहरांमध्ये गेली सहा वर्षापासून श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने निराधार वृद्ध नागरिकांसाठी दोन वेळचे मोफत जेवण दिले जाते.
या अन्नपूर्णा योजनेत वृद्ध नागरिकांच्या आनंदासाठी श्री. गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. तसेच श्रीराम प्रतिष्ठान हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असून श्रीराम प्रतिष्ठान व गणेश भाऊ चिवटे यांच्या सामाजिक कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो. यापुढेही श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने असेच सामाजिक उपक्रम राबवत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. येथील गणरायाची पूजा करण्याचा योग आला हे माझे भाग्य आहे असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य रामभाऊ ढाणे, विलास आबा जाधव, अभिजीत वाशिंबेकर, दीपक गायकवाड, संजय किरवे, महादेव गोसावी, विनोद इंदलकर व श्रीराम प्रतिष्ठानचे लाभार्थी उपस्थित होते.



