
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीचे काम पुन्हा सुरू झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती करमाळा चे नवनियुक्त सदस्य भरतभाऊ अवताडे यांनी दिली आहे.


माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून या योजनेसाठी ११६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. डिसेंबर २०२३ मध्ये या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. काम युद्धपातळीवर सुरू असताना नोव्हेंबर २०२४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर हे काम थांबवण्यात आले होते. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
दरम्यान, बंद नलिका वितरण प्रणालीचे काम पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्जुननगर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेत बंदनलिका वितरण प्रणालीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना भरतभाऊ अवताडे म्हणाले की, स्व. अजितदादा पवार यांनी या योजनेसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. काम बंद झाल्यानंतर हा प्रकार त्यांच्या कानावर घालण्यात आला होता. आंदोलन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर हे काम पुन्हा सुरू झाले असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
बंद नलिका वितरण प्रणालीचा विरोध का मावळला? – ॲड. अजित विघ्ने, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस.
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीला सुरुवातीला विद्यमान आमदार नारायण पाटील आणि त्यांच्या प्रवक्त्यांकडून विरोध करण्यात येत होता. बंद नलिकेमुळे पाणी जमिनीत मुरणार नाही आणि शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असे सांगत ही योजना चुकीची असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र आता त्याच योजनेचे काम पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे आधी करण्यात आलेला विरोध नेमका का थांबला, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अॅड. अजित विघ्ने यांनी उपस्थित केला आहे.



