
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


देवळाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे प्रभावी कार्यकर्ते आशिष गायकवाड यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अपात्रतेचा दावा अखेर कोल्हापूर खंडपीठात फेटाळण्यात आला आहे. या निर्णयामुळे गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाला असून, ग्रामपंचायतीतील त्यांच्या पात्रतेचा निर्णय कायम राहिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ही संपूर्ण प्रक्रिया सुरु होती. सुधीर आवटे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे आशिष गायकवाड यांचे ग्रामपंचायत सदस्य पद अपात्र ठरविण्याबाबत अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना अपात्र ठरविले होते. त्यानंतर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्या निकाला विरोधात पुणे विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. त्या अपीलावर सुनावणीदरम्यान आयुक्तांनी गायकवाड पात्र असल्याचा निर्णय दिला. यानंतर सुधीर आवटे यांनी या निर्णयाविरोधात हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठात रिट पिटीशन दाखल केले होते. मात्र न्यायालयाने सर्व बाबींचा सखोल विचार करून, गायकवाड यांच्या बाजूने निकाल देत आवटे यांचे रिट पिटीशन फेटाळून लावले.
या प्रकरणात ॲड. अजिंक्य गायकवाड व ॲड. ऋत्विक गाडगे यांनी आशिष गायकवाड यांचे कायदेशीर प्रतिनिधीत्व करत प्रभावी युक्तिवाद सादर केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देवळाली ग्रामपंचायतीतील गायकवाड यांचे राजकीय स्थान अधिक मजबूत झाले आहे. या निकालानंतर माजी आमदार संजयमामा शिंदे गट, कल्याण भाऊ गायकवाड युवा मंच आणि ग्रामस्थांनी आशिष गायकवाड यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
“सत्य आणि न्याय नेहमीच विजय मिळवतो. माझ्यावर दाखल केलेले अपात्रतेचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते, मात्र न्यायालयाने वस्तुस्थिती ओळखून न्याय दिला आहे.”
श्री. आशिष गायकवाड, माजी सरपंच, देवळाली.



