करमाळ्यात उद्या भरणार विषमुक्त भाजीपाला बाजार; पाणी फाउंडेशन चा पुढाकार

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये उद्या रविवार दि. ५ ऑक्टोबर रोजी विषमुक्त भाजीपाला बाजार भरणार असून याप्रसंगी पाणी फाउंडेशनचे राज्य समन्वयक सत्यवान देशमुख, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून विषमुक्त भाजीपाला खरेदीसाठी करमाळा तालुका व शहरातील सुज्ञ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पाणी फाउंडेशन टीम करमाळा चे प्रतीक गुरव व आशिष लाड यांच्याकडून करण्यात आले आहे.
विज्ञान तंत्रज्ञानाच्या सध्या धकाधकीच्या युगामध्ये माणसाचं शारीरिक स्वास्थ्य हरवत चाललं आहे. लहान मुलांना सुद्धा वेगवेगळे आजार जडू लागले आहेत. हृदयविकार, मधुमेह यांचे प्रमाणही वाढू लागलेले आहे. कर्करोगाने तर सर्वत्रच थैमान घातलेले आहे या सगळ्यांचे मुख्य कारण म्हणजे आहार हे आहे. भरमसाठ कीटकनाशकांची फवारणी केले गेलेले अन्न ग्रहण करण्यात आल्यामुळे असे घडत आल्याचे निष्कर्ष आहेत. त्यामुळे हे टाळायचे असेल तर विषमुक्त अन्न आणि विषमुक्त भाजीपाला ग्राहकांना उपलब्ध झाला पाहिजे हीच संकल्पना डोळ्यापुढे ठेवून पाणी फाउंडेशन टीम करमाळा यांनी गेल्या सहा महिन्यापासून विषमुक्त भाजीपाला पिकविणारे उत्पादक व विषमुक्त भाजीपाला खरेदीसाठी इच्छुक असलेले ग्राहक यांचा मेळावा यशकल्याणी संस्था या ठिकाणी घेऊन या विषयी जाणीव जागृती केली होती.
यानंतर सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा, समृद्ध गाव स्पर्धा, फार्मर कप स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून विषमुक्त उत्पादन घेण्याचा कल असलेले तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील शेतकरी एकत्र करून विषमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. महेंद्र देशमुख, अतुल राऊत, सोमनाथ सायकर, विजय अवताडे, गोपीनाथ रोकडे, सुनील दौंडे, हिराजी राऊत, धनाजी माने, जीवन होगले, विक्रम खरात, प्रताप जाधव या शेतकऱ्यांचे विष मुक्त भाजीपाल्याचे स्टॉल असणार आहे.



