कोर्टी व संगोबा येथील पूर परिस्थितीची अजितदादा पवार यांच्याकडून पाहणी; शेतकऱ्यांना दिले मदतीचे आश्वासन

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी करमाळा मतदारसंघातील कोर्टी व संगोबा येथे आज बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी आमदार नारायण आबा पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे, प्रांत अधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा व तालुका पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी करमाळा तालुक्यातील सर्व पाझर तलाव, लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्प व ओढ्या नाल्यावरील पुल यांच्या सद्यस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना माहिती दिली. “अतिवृष्टीमुळे शेतजमिनी व पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कोणताही शेतकरी वंचित राहू नये“ अशी सक्त सूचना पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली.
सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थितीचा पाहणी दौरा करमाळा तालुक्यातील कोर्टीपासून सुरू झाला. त्यानंतर संगोबा येथील सीना नदीच्या पूर परिस्थितीची व शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. सततच्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याने अजित पवार यांनी थेट शेतात जाऊन पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे व आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना पवार यांनी दिल्या. तसेच अडचणीच्या काळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असून वेळ पडल्यास ड्रोनचा वापर करून पिकांचे पंचनामे करू. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.



