शेतकऱ्यांना सरसकट तातडीची भरपाई द्या; दिग्विजय बागल यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

करमाळा/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)


अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीसाठी कोणतेही अतिरिक्त निकष न लावता सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम मागणी शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली. अजितदादा पवार हे मुंगशी (ता. माढा) येथे पाहणी दौऱ्यावर असताना बागल यांनी ही मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी“नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही,”असे आश्वासन दिले.
करमाळा विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पिके वाहून गेली असून अनेक शेतकऱ्यांची मातीही नुकसानग्रस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर बागल यांनी सरसकट पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. बागल यांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत परिसरातील शिंगेवाडी गावात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली, त्यांच्या व्यथा ऐकल्या आणि त्यांना दिलासा दिला. या वेळी शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले.
या पाहणीला मकाई साखर कारखान्याचे संचालक सतीश निळ, भाजपा अध्यक्ष सचिन पिसाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बागल यांनी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.



