आदिनाथ बचाव समितीची रविवारी बैठक; सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
कामगारांचा होणार सत्कार; पुढील भूमिका ठरणार
करमाळा/प्रतिनिधी


आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा येणारा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणे तसेच येणाऱ्या काळात आजिनाथ कारखान्याच्या संदर्भात पुढील भूमिका ठरवणे. यासाठी रविवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय विश्रामगृह करमाळा येथे आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांच्या बैठकीचे आयोजन केले आहे, तरी सर्व सभासदांनी उपस्थित राहावे. असे आवाहन आदिनाथ सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे निमंत्रक महेश चिवटे यांनी केले आहे.
या बैठकीसाठी बचाव समितीचे निमंत्रक प्रा. रामदास झोळ, आदिनाथचे माजी संचालक डॉ. वसंतराव पुंडे, माजी चेअरमन संतोष पाटील, तरडगावचे माजी सरपंच डॉ. घाडगे, मार्केट कमिटीचे माजी संचालक देवानंद बागल, महेंद्र पाटील, माजी चेअरमन शहाजीराव देशमुख सर, सवितादेवी राजेभोसले, उपाध्यक्ष रमेश अण्णा कांबळे, उपाध्यक्ष मकाईचे संचालक सुभाष शिंदे, प्राचार्य जयप्रकाश बिले आदींसह आदिनाथचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा तालुक्याचा स्वाभिमान असून शेतकऱ्यांचे मंदिर आहे. पुढील वर्षी येणाऱ्या हंगामात किमान पाच लाख टन उसाचे गाळप झाले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आजिनाथ कारखान्याला इथेनॉल उत्पादनाची परवानगी मिळावी. सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाला महाराष्ट्र शासनाने हमी देऊन भांडवल उपलब्ध करून द्यावे, यासाठी पाठपुरावा करणे. तसेच या हंगामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. अशी माहिती बचाव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.



