-->
आरोग्यसामाजिक

विठ्ठलराव शिंदे कारखाना प्रदूषण विरोधात जनशक्ति आक्रमक; विनिता बर्फे यांचा आंदोलनाचा इशारा

 

प्रतिनिधी/मच्छिंद्र वाघमारे

 

विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना लिमिटेड पिंपळनेर ता. माढा जि. सोलापूर या साखर कारखान्यापासून होणाऱ्या प्रदूषणामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्याच्यावर कारवाई करणे बाबत जनशक्ति शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी सोलापूर, उप प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ सोलापूर यांना निवेदन देऊन माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या प्रदूषणाचा व दूषित पाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली असून सदर मागणीवर तातडीने कारवाई न झाल्यास जनशक्ति शेतकरी संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 

माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यातील राख मोठ्या प्रमाणात कारखान्याच्या दहा किलोमीटर परिसरात उडत आहे. त्यासाठी कारखान्याने कुठलीही उपाययोजना केलेली नाही. गेल्या पंधरा वर्षापासून साखर कारखान्याच्या परिसरातील लोकांचे श्वसनाचे आजार सुरू झालेले आहेत. घरामध्ये व घरासमोर पूर्णपणे काळी राख पसरत असून ती गोरगरीब जनतेच्या पोटामध्ये सुद्धा जात आहे. त्यामुळे अनेक पोटाचे विकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तातडीने त्याची चौकशी होऊन विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

 

या साखर कारखान्याची गाळप क्षमता १२ हजार मॅट्रिक टन असून एक लाखापेक्षा जास्त लिटर क्षमतेचा डिस्टलरी प्रकल्प आहे. त्यातून निर्माण होणारे पेंटॉस दूषित पाणी याची विल्हेवाट लावण्याची कारखान्याकडे कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे परिसरातील ओढा, नदी व नाल्यामध्ये ते टाकून दिले जात आहे. त्यामुळे संपूर्ण माढा करमाळा तालुक्यातील बोअर, विहिर, नदी व कॅनॉल मध्ये केमिकल उतरले आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे रंग बदललेले आहेत त्यामुळे परिसरातील व्यक्तींना कॅन्सरचा धोका निर्माण झालेला आहे. कारखान्याचे चेअरमन बबनराव शिंदे यांच्याकडे खूप गुंडगिरी करणारे लोक आहेत याच लोकांना पेंटॉस वाहतूक करण्यास सांगितले जाते. त्यामुळे सामान्य नागरिक त्याविरुद्ध आवाज उठवू शकत नाही तसेच तीस वर्षापासून आमदार असल्यामुळे त्यांचा प्रशासनावर खूप मोठा वचक आहे, त्यामुळे प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही. अनेक लोकांचा विरोध असताना सुद्धा ते दूषित पाणी त्यांच्या गावात त्यांच्या शेतात दमदाटी करून टाकत आहेत.

 

आपणास विनंती की, आपण ताबडतोब एक कमिटी नेमून कारखान्यातून राख उडून इतरत्र पसरू नये यासाठी कारखान्याने काय केले आहे का ते पाहावे. तसेच पेंटॉस म्हणजेच दूषित पाणी कोठे टाकले जाते याची चौकशी करून कारखान्यावर कारवाई करावी. अन्यथा आम्हांला नाईलाजास्तव आंदोलन करावे लागेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. अशी मागणी जनशक्ति संघटनेच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close