शिवरस्ता खुला करण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश; चिखल अंगावर लावून दिले आंदोलनाचे निवेदन

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील आळसुंदे–वरकुटे शिवरस्ता खुला करण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून पाठपुरावा करणारे शेतकरी आणि राणा वाघमारे यांनी आज सोमवार दि. १६ जून रोजी करमाळा तहसील कार्यालय व करमाळा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन हा शिवरस्त्या येत्या १० दिवसात शेतकऱ्यांसाठी खुला करून न दिल्यास तिसऱ्यांदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आपल्या आंदोलनाची गंभीरता पुन्हा एकदा अधोरेखित करत त्यांनी २७ जून २०२५ रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांना अनोख्या पद्धतीने संपूर्ण अंगावर चिखल लावून निवेदन सादर केले.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही आजवर आमरण उपोषण, रस्ता रोको आंदोलन करूनही शिवरस्ता खुला झालेला नाही. उलटपक्षी, आंदोलनकर्ते राणा वाघमारे यांच्यासह २१ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन शेतीच्या वाहनांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच १० जून २०२५ रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आम्ही भेट घेतली आता त्यांनी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना रस्ता तात्काळ खुला करून रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच, यापूर्वी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनीही सकारात्मक आदेश दिला आहे. मात्र, करमाळा तहसील प्रशासनाकडून अद्याप रस्ता खुला करण्यात आलेला नाही, ही शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बाब आहे.
राणा वाघमारे यांच्यासह आळसुंदे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे की, येणाऱ्या १० दिवसांत रस्ता खुला न झाल्यास २७ जून रोजी लहान मुले, महिलावर्ग, जनावरे व शेतकरी बांधवांसह करमाळा तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
या वेळी निवेदन देताना राणा वाघमारे यांच्यासोबत संजय धारक, ज्योतीराम घाडगे, अभिमान घाडगे, रामभाऊ हांडे, बालाजी घाडगे, अक्षय घाडगे, नवनाथ सरवदे, परम मोरे, जयसिंग पाटील, जयसिंग घाडगे, शहाजी देवकते, शहाजी घाडगे, तानाजी घाडगे, विष्णू वायकुळे, चिंतामणी सरवदे यांच्यासह आळसुंदे व वरकुटे येथील शेतकरी उपस्थित होते.



