सरसकट शेती पिकांचे पंचनामे करा; अन्यथा शासकीय आदेशाची होळी करणार- अतुल खूपसे पाटील

प्रतिनिधी/माढा (माय मराठी न्यूज नेटवर्क)


सध्या माढा तालुक्यामध्ये तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या नावे एक प्रशासकीय आदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत असून यामध्ये अवकाळीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे होण्यासाठी शासन निर्णय दि. २७ मार्च २०२३ नुसार कमीत कमी ३३% नुकसान झालेले असणे बंधनकारक असल्याचा उल्लेख आहे. वास्तविक पाहता, गेले दहा दिवस सुरू असलेल्या वादळी पावसामुळे पूर्ण महाराष्ट्रात थैमान घातलेले असताना आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना त्यांना सरकारी पंचनाम्यासाठी टक्केवारीची अट घालणे अन्यायकारक असल्याचे मत जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी व्यक्त करून शेती पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करत असे न झाल्यास शासकीय अध्यादेशाची होळी करणार असल्याचे अतुल खूपसे पाटील यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, यावर्षी झालेल्या न भूतो न भविष्यती अशा प्रकारच्या पावसाने शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागला आहे. फळबागा, ऊस शेती, भाजीपाला पिके मातीमोल झाली आहेत. कित्येक ठिकाणी घरे, जनावरे यांची अतोनात हानी झाली आहे. अशात मायबाप सरकार हीच एकमेव अशा असताना तेच जर तीन वर्षांपूर्वीच्या जुन्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांसोबत भेदभाव करणार असतील तर जनशक्ती शेतकरी संघटना अजिबात गप्प बसणार नाही. असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
अतुल खूपसे पाटील यांनी आपली मागणी मांडताना सांगितले की, कोणत्याही शेतकऱ्यांसोबत कसलाही भेदभाव न करता सरसकट १०० % पंचनामे प्रशासनाने करावे. अन्यथा जनशक्ती संघटना सरकारी आदेशाची होळी करून आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



