
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज नेटवर्क)


रावगाव (ता. करमाळा) येथे स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र रावगावच्या वतीने इयत्ता बारावी, दहावी, एम. एम. एन. एस. तसेच स्कॉलरशिप परीक्षेत नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार केंद्राच्या वतीने करण्यात आला.
आजच्या स्पर्धेच्या युगात कोणत्याही क्षेत्रात गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भरपूर मेहनत, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास लागतो. विशेषत: शैक्षणिक क्षेत्रात उच्च दर्जाचे गुणवत्ता व यश संपादित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केलेली असते. तेव्हा या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा, प्रोत्साहन देण्यासाठी सत्काराच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप देणे आवश्यक असल्याचे मत केंद्र चालक माधव फुंदे गुरुजी यांनी केले.
हनुमंत रासकर यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी व ते स्वावलंबी बनावेत यासाठी आम्ही शिक्षक तर लक्ष ठेवतोच परंतु पालकांनीही त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना मोबाईल टीव्ही व वाईट संगती पासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी घरामध्ये पोषक व अनुकूल वातावरण ठेवावे तसेच वेळोवेळी त्यांना दर्जेदार पुस्तके व साहित्य वाचनासाठी उपलब्ध करून द्यावेत तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी आपल्या गावात असणाऱ्या ग्रंथालयाचाही फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले.
यावेळी प्रताप बरडे सर, अंकुश पाटील, हनुमंत रासकर सर, भास्कर पवार, राहुल गोसावी, राजू बुधवंत, भागवत बरडे, मधुकर गोरे, पैगंबर शेख, प्रकाश कांबळे, गणेश कांबळे, डॉ. गोरे, दत्तात्रय शेळके, विनोद जाधव, दिगंबर जाधव तसेच महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल गोसावी यांनी केले तर आभार राजू बुधवंत यांनी मानले.




