करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील शेलगाव (क) या गावाची वाटचाल समृद्धीच्या दिशेने असल्याचे गौरवोद्गार करमाळ्याचे तहसीलदार समीर माने यांनी शेलगाव येथील गाव भेटी दरम्यान काढले.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील अनेक गावांनी वॉटर कप या स्पर्धेत उल्लेखनीय काम केलेले आहे. २०१८ साली करमाळा तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेचा द्वितीय क्रमांक शेलगाव (क) या मिळवला आहे. आज या गावाची वाटचाल समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून समृद्धीकडे चाललेली आहे. त्याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत असे प्रतिपादन करमाळा तालुक्याचे तहसीलदार समीर माने यांनी केले.
पाणी फाउंडेशन ने २०२० सालापासून समृद्ध गाव स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेच्या निकषानुसार पौष्टिक गवताची नर्सरी उभा करणे व त्याची लागवड करणे, वृक्षारोपण करणे व त्याचे संवर्धन करणे, हंगाम निहाय पिकांचे सर्वेक्षण करणे, वर्षातून तीन वेळेस विहिरीची पाणी पातळी मोजणे, पर्जन्यमापकाद्वारे पावसाच्या नोंदी मोजणे व ठेवणे, शेतीसाठी आवश्यक असणारे कंपोस्ट खत, नॅडप खत व गांडूळ खत प्रकल्प उभा करणे यांसारखी आदी कामे समृद्ध गाव स्पर्धेत अपेक्षित आहेत आणि ही कामे शेलगाव चे ग्रामस्थ अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करत आहे त्यामुळे या गावातील ग्रामस्थांचे कौतुक करावे तितके कमीच आहे असे गौरवोद्गार काढले. तसेच भविष्यात प्रशासनातील जबाबदार घटक म्हणून ग्रामस्थांना जेव्हा कधी सहकार्य लागेल तेव्हा सहकार्य करण्याची भूमिका आपण निश्चितच पार पाडू असेही तहसीलदार समीर माने यांनी शेलगाव येथील गाव भेटी प्रसंगी सांगितले. बापू माने यांच्या शेतामध्ये उभा केलेल्या गांडूळ बेडची पाहणी त्यांनी केली त्यावेळेस ते बोलत होते.
याप्रसंगी शेलगाव (क) चे कृषी सहाय्यक श्री. खाडे, पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक प्रतिक गुरव, डॉ. विकास वीर, बापू माने, वैभव वीर, सचिन वीर, लखन ढावरे, सुनील वीर, अमोल पायघन, सुनील पायघन, सुनील माने आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



