आदिनाथला संजयमामांसारख्या अभ्यासू नेतृत्वाची गरज- राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रण धुमाळी उठली आहे, अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. या आधी तालुक्यातील प्रत्येक नेत्याने कारखान्यावर आपली सत्ता स्थापना केली आहे. मात्र एकालाही सभासद, शेतकरी आणि कारखाना यांना न्याय देता आला नाही. एखादी संस्था, कारखाना चालवण्यासाठी अनुभव आणि त्या त्या परिस्थिती नुसार निर्णय घेण्याची क्षमता असावी लागते आणि ती माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आहे. त्यांच्या कामाचा परिचय तालुक्याला गेल्या पाच वर्षात आलेला आहे. त्यामुळे आता लोकांनी डोळसपणे या निवडणुकीकडे बघावं, मागील विधानसभा वेळी झालेली चूक सुधारून घ्यावी. असे प्रतिपादन राजकुमार देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष, सोलापूर) यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी करमाळ्यात आल्यानंतर जाहीर आवाहन केले होते की, संजयमामा ला निवडून द्या कारखाना जागेवर आणतो. कारण दादा मामाचे सलोख्याचे संबधं सगळ्यांना माहित आहेत आणि याच गोष्टीचा फायदा कारखाना पूर्वपदावर आणायला होणार आहे. त्यामुळे मामांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या आदिनाथ बचाव पॅनलला निवडून आणण्याचे आवाहन राजकुमार देशमुख यांनी केले आहे.



