
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


साहित्य हे समाजाला जगण्याची व जागवण्याची प्रेरणा देत असून समाजात समरसता निर्माण करण्यासाठी समरसता साहित्य परिषदेचे काम कौतुकास्पद असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक भारत सरकारचा ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झालेले मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केले. समरसता साहित्य परिषद सोलापूर यांच्यावतीने मारुती चित्तमपल्ली यांचा मानाचा फेटा व समरसता साहित्य परिषदेचे मानचिन्ह असलेला फोटो फ्रेम देऊन सन्मान करण्यात आला. अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांना भारत सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने अक्कलकोट रोड येथील मणीधारी सोसायटी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, निसर्ग हा आपला खरा मित्र असून निसर्गाच्या सानिध्यात राहून प्राणीमात्रांसह जीवनाची साखळी अखंड ठेवून आपण काम करत राहिले तर खऱ्या अर्थाने निसर्गाचे संवर्धन होऊन मानवाचे कल्याण होणार आहे. त्यामुळे मानवी कल्याणासाठी समरसता साहित्य परिषदेने समाजामध्ये जागृती निर्माण करून निसर्ग संवर्धना बरोबर निकोप समाज निर्मितीसाठी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती करावी. आपण माझा केलेला सन्मान हा मी प्रामाणिकपणे निसर्गाशी एकरूप होऊन प्राणीमात्रावर दया भावनेने सेवा केल्यामुळे मला ‘पद्मश्री’ हा सन्मान मिळत आहे. मी केलेल्या निसर्गाच्या, प्राणीमात्राच्या व मानवतेच्या सेवेची ही पोहचपावती असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या प्रसंगी डॉ. भीमाशंकर बिराजदार, प्रा. धन्यकुमार बिराजदार, प्रा. माधव कुलकर्णी, देवेंद्र औटी यांनी मनोगत व्यक्त करत अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यिक प्रवासाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. तरुण भारतचे माजी वृत्तसंपादक व साहित्यिक दशरथ वडतीले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. रेवणसिद्ध फुलारी व श्रद्धा रोडगे यांनी अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्यावर रचलेल्या गीतांचे गायन केले. सोलापूर जिल्हा समरसता साहित्य परिषदेने केलेल्या सन्मानाबद्दल अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांनी कृतज्ञता व्यक्त करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन समरसता साहित्य परिषदेच्या कार्यास सर्वतोपरी सहकार्य, मार्गदर्शन करणार असल्याचे अभिवचन दिले.
यावेळी मार्गदर्शक सल्लागार प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार, प्रा. धन्यकुमार बिराजदार यांच्यासह सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. माधव कुलकर्णी, महिला आयाम प्रमुख वसुंधरा शर्मा- कुलकर्णी, कार्यवाह कविवर्य देवेंद्र औटी, युवती आयाम सहप्रमुख श्रद्धा रोडगे, झी कन्नड सारेगमप लिटल चॅम्प्स फायनललिस्ट रेवणसिद्ध फुलारी, प्रसिद्धी आयाम प्रमुख शरणप्पा फुलारी, काशिनाथ बिराजदार, पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष जगन्नाथ हुक्केरी, सहकार्यवाह दिनेश मडके, अनिता कुलकर्णी, शुभांगी पुजारी, अर्णव कुलकर्णी यांच्या सह विविध आयाम प्रमुख उपस्थित होते.



