
प्रतिनिधी/मोर्शी (माय मराठी न्यूज)


नांदगावपेठ, मोर्शी, वरूड, पांढूर्णा राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण असतांनाही वरूड मोर्शी अमरावती राष्ट्रीय महामार्गावर मोर्शी वरूड तालुक्यात निंभी येथील टोल नाका सुरू केला आहे. तसेच पुसला येथील टोल नाका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हजारो नागरिकांचे बळी घेऊन त्यांचे संसार उध्वस्त करणाऱ्या, निकृष्ट दर्जाच्या, अपूर्ण अवस्थेत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नींभी, पुसला येथील टोल नाका खासगी चार चाकी वाहनांना टोल मुक्त करण्याबाबत शासनाने आपली भुमिका स्पष्ट करून मोर्शी वरूड तालुक्यातील दोन्ही टोल नाके टोल मुक्त न केल्यास मोर्शी वरूड तालुक्यात जन आंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिला आहे.
नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढूर्णा राष्ट्रीय महामार्गावरून हजारो नागरिक रोज मोठ्या संख्येने अमरावती- पांढूर्णा ये-जा करीत असतांना नांदगावपेठ येथील टोल नाक्यावर ८ किलोमीटर करीता शेकडो रुपये टोल वसुल करून मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकांना भुर्दंड सोसावा लागत असतांना आता पुन्हा नींभी, पुसला येथे टोल नाका सुरू करून वाहन धारकांची लूट होणार असल्यामुळे निंभी, पुसला येथील टोल नाका खासगी चार चाकी वाहनांसाठी व शेतकऱ्यांचा शेतमाल वाहून नेणाऱ्या वाहनांसाठी रद्द करण्याचा निर्णय शासनाने त्वरित घ्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निंभी येथील टोल नाका, सुरू केल्यामुळे नागरिकांना जास्तीचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. नियमाप्रमाणे ७० किलो मीटरपर्यंत रस्ता व्यवस्थित असेल तरच टोल आकारता येतो. या महामार्गाचे काम पूर्ण झाले नसतांनाही जाणीवपूर्वक टोल आकारला जाणार असेल तर त्याला आमचा पूर्णपणे विरोध असल्याचे मत रुपेश वाळके यांनी व्यक्त केले आहे.
नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढुर्णा पर्यंतचे काम हाती घेऊन अनेक वर्ष झाले. आतापर्यंत विविध कारणांनी महामार्गाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढुर्णा पर्यंत ये-जा करताना वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. या महामार्गावरील अनेक पुलांचे काम झालेले नसल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणत अपघात घडत आहे. वन खात्याने परवानगी देऊन सुद्धा काम लवकर पूर्ण केले जात नाही. अपूर्ण पुलांची कामे पूर्ण केल्या जात नाही. तीन वर्षातच राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय होण्याच्या मार्गावर असून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. त्यामुळे आधी रस्त्याचे व पुलांचे काम पूर्ण करावे, पुसला व निंभी येथील टोल नाके रद्द करून वरूड मोर्शी तालुक्यातील टोल नाक्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांच्या तर्फे करण्यात आली आहे.
हजारो नागरिकांचे संसार उध्वस्त करणाऱ्या महामार्गावर टोल वसुली कशासाठी ?
नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढूर्णा राष्ट्रीय महामार्गाचे काम नीकृष्ट दर्जाचे व अपूर्ण अवस्थेत असतांनाही या राष्ट्रीय महामार्गावर मोर्शी वरूड तालुक्यात निंभी व पुसला येथे टोल नाका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हजारो नागरिकांचे बळी घेऊन त्यांचे संसार उध्वस्त करणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अपूर्ण अवस्थेत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नींभी, पुसला येथील टोल नाक्याबद्दल शासनाने आपली भूमिका स्पष्ट न केल्यास आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. – रुपेश वाळके, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मोर्शी तालुका.



