ज्यांच्या सांगण्यावरून गोविंदपर्वला ऊस दिला तेच गोविंदपर्व विरोधात आंदोलन करणार! शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

केतुर प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)


गेल्या दोन महिन्यांपासून करमाळा तालुक्यात एकच चर्चा चालू आहे की प्रा. रामदास झोळ सर विधानसभा निवडणुक लढवणार म्हटल्यावर आपल्याला गोविंद पर्व ॲग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि. कारखान्याकडे गाळपास दिलेल्या आपल्या उसाचे पैसे मिळणार. त्याबाबत विविध माध्यमातून आवाज उठवण्यात आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची बिले अडकली आहेत त्यांनी दि. ०६ सप्टेंबर २०२४ रोजी मा. तहसीलदार व मा. पोलीस निरीक्षक यांना उपोषणाचे निवेदनही दिले आहे. निवेदन देऊन सात दिवस झाले तरीही प्रशासनाने अजून कसल्याही कारवाईचा विचार केला नाही. त्यातच आज गोविंद पर्व कारखान्याचे संचालक असलेल्या प्रा. झोळ सर यांनी गोविंदपर्व कारखान्याची थकीत बिले मिळावीत म्हणून माजी खासदार व शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी साहेब याची भेट घेऊन त्या बिलाबद्दल आंदोलन करणार असल्याचे विधान केले आहे.
आता शेतकरी विचारात पडले आहेत आम्ही तर गोविंद पर्वला ऊस प्रा. रामदास झोळ सर यांचे सांगण्यावरून दिला होता आणि आता तेच म्हणतात की, मी गोविंदपर्व कारखान्याच्या विरोधात आंदोलन करणार! तर आमची बिल नक्की देणार कोण? असा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. का फक्त निवडणुकीच्या तोंडावर बनवाबनवी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसायची आहेत. अशीही उलट सुलट चर्चा शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे.
मी माझा ऊस प्रा. रामदास झोळ सर यांच्या सांगण्यावरूनच राजुरी येथील गोविंदपर्व अग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि. या कारखान्याकडे सन २०१८-१९ च्या गाळप हंगामात गाळपासाठी दिला होता. तसेच आमचे गोविंद पर्व कडील थकीत ऊस बिल मिळावे म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी दि. ०६ सप्टेंबर रोजी मा. तहसीलदार मॅडम, करमाळा यांच्याकडे निवेदन दिले आहे. परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
धनंजय मारुती कांबळे शेतकरी, उंदरगाव.



