
माय मराठी न्यूज


करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील कुर्डूवाडी येथे राज्य राखीव पोलीस दल गटाची स्थापना करण्यात यावी. अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे लेखी पत्र देऊन केली असल्याबाबतची माहिती भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल यांनी आज दिली.
याबाबत अधिक बोलताना भाजपा प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल म्हणाल्या की, कुर्डूवाडी हे करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे मध्यवर्ती शहर असून मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन आहे. येथून राज्यातील विविध ठिकाणी, आपतकालीन वेळी कमी वेळात रेल्वे, एसटी बस व अन्य यंत्रणेने सहज पोहोचता येते. याशिवाय करमाळा, बार्शी ,माळशिरस ,माढा पंढरपूर पुणे जिल्ह्यातील इंदापूर या तालुक्यांना कुर्डूवाडी हे शहर मध्यवर्ती व जवळचे असल्याने मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. या सर्व दृष्टीने कुर्डूवाडी येथे राज्य राखीव पोलीस बल (एस.आर.पी.एफ.) गट झाल्यास प्रशासनाच्या दृष्टीने सोयीचे होईल. व याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. याशिवाय स्थानिक युवकांना एस.आर.पी.एफ. मध्ये भरती होण्यासाठी ट्रेनिंग सेंटर उपलब्ध होईल. तसेच सध्या सोलापूर आणि दौंड येथेच एस.आर.पी.एफ. चे कॅम्प आहेत. त्यामुळे कुर्डूवाडी सारख्या मध्यवर्ती ठिकाणी एस.आर.पी.एफ. कॅम्प होणे गरजेचे आहे. या सर्व बाबींचा विचार करून कुर्डूवाडी येथे राज्य राखीव पोलीस बल (एस.आर.पी.एफ.) गट स्थापना होणे बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना लेखी पत्र देऊन विनंती केली असून याबाबत लवकरच कार्यवाही होईल. अशी आशा रश्मी बागल यांनी शेवटी व्यक्त केली.
यावेळी भाजपा जिल्हा युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर, संचालक आशिष गायकवाड, सतीश निळ, अजित झांजुर्णे, युवराज रोकडे, गणेश झोळ, बाळासाहेब पांढरे, काशिनाथ काकडे, कुलदीप पाटील, राजेद्र मोहळकर, सुनिल लोखंडे, शौकत नालबंद, सचिन घोलप, संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.



