शेतकऱ्यांचा आधारवड असणाऱ्या आदिनाथ कारखान्याला विलासराव घुमरे सर गतवैभव मिळवून देणार- विजय पवार
माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)


करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याचा आधारवड असणाऱ्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला विलासराव घुमरे सर अडचणीतून बाहेर काढून पुन्हा गत वैभव मिळवून देणार असल्याचे मत भाजपाचे समर्थक नेते उद्योजक विजयदादा पवार यांनी व्यक्त केले. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय संचालकपदी विद्या विकास मंडळाचे सचिव भाजपाचे ज्येष्ठ नेते विलासराव घुमरे सर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला, या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास भाजपाचे माजी तालुका सरचिटणीस उद्योजक आदेश कांबळे, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके, उद्योजक मनोज कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विजयदादा पवार म्हणाले की, आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासदांचा मालकीचा कारखाना असुन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक उत्क्रांती करण्याचे काम या कारखान्याने केले आहे. त्यामुळे या कारखान्याप्रती शेतकऱ्याचे जिव्हाळ्याचे नाते आहे. राजकारणाच्या स्थित्यंतरामुळे आदिनाथ कारखान्याची परिस्थिती बिकट झाली आहे. आदिनाथ कारखान्यावर आर्थिक संकटाचा डोंगर उभा राहिला. योग्य नियोजन, वाहतूक यंत्रणा व आर्थिक पाठबळ मिळाले नसल्याने तत्कालीन प्रशासक संचालक मंडळाच्या काळात आदिनाथ कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वी झाला नाही. त्यामुळे शेतकरी सभासद ही अडचणीत आला, पण आता खऱ्या अर्थाने करमाळा तालुक्याचे किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे राजकारणातील भीष्माचार्य मार्गदर्शक असणारे विलासराव घुमरे सर यांची प्रशासकीय संचालकपदी निवड झाली असून यशस्वी त्यांच्या नियोजनानुसार कारखान्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी भाजप सरकारच्या सहकार्याने पुन्हा कारखान्याला गत वैभव मिळवून देतील. असा विश्वास शेतकरी सभासदांमध्ये निर्माण झाला आहे.
करमाळ्यात तालुक्यातील शेतकऱ्याचा ऊसाला योग्य भाव मिळुन अतिरिक्त उसाचा प्रश्नही यापुढे निर्माण होणार नसल्याने शेतकरी सभासद यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विलासराव घुमरे सर यांच्या निवडीचे स्वागत होत असुन शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व विविध चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.




